सत्ताधारी ९ तर विरोधी गटास ७ जागा, १ अपक्ष विजयी
प्रतिनिधी/खानापूर
अत्यंत चुरशीने झालेल्या खानापूर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी आमदार अनिलभाऊ बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस- शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता कायम ठेवली आहे. नगरपंचायतच्या इतिहासात अत्यंत काटा लढत होऊनही सुहास शिंदे यांना सत्ता टिकवण्यात यश आले आहे. यात शिवसेना- काँग्रेस महाविकास आघाडीला ९ जागा मिळाल्या. तर जनता आघाडीने चांगली लढत देऊन ७ जागा मिळवल्या असून एक अपक्ष निवडून आला आहे. निकालानंतर सत्ताधारी गटाने फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात विजयी आनंद साजरा केला.
खानापूर नगरपंचायतची निवडणूक अतिशय रंगतदार अशीच झाली. शहरातील दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर ताकद लावण्यात आली होती. तसेच एकतर्फी निकालाच्या वलग्नाही करण्यात आल्या होत्या. मात्र अत्यंत आटातटीने झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीला ९ जागी विजय मिळवता आला. यात प्रामुख्याने डॉ. उदयसिंह हजारे यांची मुख्य भूमिका गटास तारणारी ठरली. तर विरोधी जनता आघाडीने ७ जागी विजय मिळवत मोठी लढत दिली. यात जनता आघाडीचे प्रमुख नेते राजेंद्र माने किंगमेकर ठरले. त्याचबरोबर जनता आघाडीतून वगळलेल्या एका अपक्षाने विजय मिळवत वादळात दिवा लावला आहे.