सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत शिवस्मारकात लाक्षणिक उपोषण,जाहीर सभा घेणार
प्रतिनिधी / खानापूर
खानापुरात रविवार दि. 1 नेव्हेंबर काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळून सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत शिवस्मारकात लाक्षणिक उपोषण तसेच यानंतर जाहीर सभा घेण्याचा निर्णय बुधवारी शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका म. ए. समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिरजे होते.
प्रारंभी म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश विशद केला. यानंतर म. ए. समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यापूर्वीच्या काळात म. ए. समितीचे नेते माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सीमाभागातील विविध अडीअडचणी तसेच सीमाप्रश्नासंदर्भात नेहमी महाराष्ट्र शासनाशी पत्रव्यवहार करून स्वत:ही संवाद साधत होते. यामुळे सीमाप्रश्नाबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांकडे महाराष्ट्र शासनाचे नेहमी लक्ष असत होते. शिवाय त्या प्रश्नाला न्यायदेखील मिळत नव्हता. पण माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या निधनानंतर पत्रव्यवहाराने संपर्क साधण्याची पद्धत बऱयाचअंशी कमी झाली आहे. ती खानापूर तालुका म. ए. समितीने पुन्हा सुरू करावी, अशी सूचना बैठकीमध्ये जि. पं. सदस्य जयराम देसाई तसेच प्रकाश चव्हाण यांनी मांडली. त्या सुचनेला उपस्थित कार्यकर्त्यांनीही पाठिंबा व्यक्त केला. यापुढे खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने पत्रव्यवहाराद्वारे महाराष्ट्र शासनाशी नियमित संपर्क ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काळय़ादिनी होणाऱया लाक्षणिक उपोषणात समिती कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची जागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
या बैठकीला नारायण लाड, मल्हारी खांबले, तानाजी कदम, महादेव घाडी, नारायण कापोलकर, नारायण पाटील, प्रकाश चव्हाण, वेवेक गिरी, विठ्ठल गुरव, दीपक देसाई, शामराव पाटील, शिवाजी पाटील, भैरु कुंभारसह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.