मुख्यमंत्री बोम्माई यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहराची 7ƒ24 पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजना कामातील सर्व अडचणींचे निवारण करु, दोन्ही योजना मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहे. विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी बेंगळूर येथे त्यांची भेट घेऊन या दोन्ही योजनासंदर्भात निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी सदर आश्वासन दिले आहे.
यावेळी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी निवदेन सादर करुन मुख्यमंत्र्यांना खानापूर शहरासाठी चोवीस तास पाणीयोजना आणि भुयारी गटार योजना मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शहराच्या विकासासाठी विशेष अनुदान मिळावे, अशीही त्यांनी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बेळगाव जिल्हय़ातील बहुतेक नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये चोवीस तास पाणी योजना मंजूर झाल्या आहेत. पण खानापूर शहराच्या योजना मंजुरीचा प्रस्ताव विविध कारणामुळे रखडला आहे. शहराची वाढती लोकसंख्या तसेच उपनगरे लक्षात घेता, ही योजना तातडीने मंजूर व्हावी, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. तर खानापूर शहराचे सर्व सांडपाणी मलप्रभा नदीला जावून मिळत असल्याने नदीचे पाणी अत्यंत गढूळ व दुर्गंधीयुक्त भरत असून यामुळे शहराच्या तसेच शहराला लागून असलेल्या काही गावांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. सध्या शहराच्या भुयारी गटार योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी 8.50 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले असले तरी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी जमीन मिळण्यात अडचण येत असल्याने प्रशासनानेच त्यामध्ये हस्तक्षेप करुन जमीन मंजूर करुन द्यावी, भुयारी गटार योजना कामांचा मार्ग मोकळा करावा, अशी त्यामध्ये विनंती करण्यात आली आहे. तसेच सदर योजनेचा पुढील टप्पाही मंजूर करावा, अशीही त्यामध्ये विनंती करण्यात आली ओह. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महसूल खात्याच्या अप्पर सचिवांना यासंदर्भात सूचना करुन जमीन मिळवण्यासंदर्भात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, वन विकास मंडळाचे सदस्य सुरेश देसाई, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेवक रफिक वारीमणी, प्रकाश बैलूरकर यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यानंतर शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामीण विकासमंत्री ईश्वराप्पा यांचीदेखील भेट घेतली. व खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष अनुदान मंजूर करावे तसेच वनखात्याच्या अखत्यारीत जाणाऱया ग्रामीण रस्त्याच्या विकासाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी मागणी केली. यावेळी मंत्री ईश्वराप्पा यांनी विशेष अनुदान मंजूर करुन देण्याचे आश्वासन दिले.