प्रतिनिधी/ खानापूर
कोरोना महामारी एका व्यक्तीकडून दुसऱयाला व तीसऱया व्यक्तीकडून चौथ्याला अशी साखळीद्वारे जलदगतीने फैलावत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार या महामारीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सॅनिटाईझर व मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. याचबरोबर पैशाची देवाण-घेवाण करतानादेखील कोरोना होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यामुळे राज्यातील अनेक बँकमध्ये तसेच बँक एटीएममध्ये सॅनिटाईझरचा ठेवणे हे बँक व्यवस्थापकांचे कर्तव्य आहे मात्र खानापूरमध्ये असणाऱया एक्सीस बँकच्या एमटीएमबरोबर तालुक्यात स्टेट बॅक, कॅनरा बँक अशा एकुण 10 एटीएम व बँकामध्ये सॅनिटायझरचा वापर टाळण्यात आला असून एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा असल्यास त्याच्या स्पर्शाद्वारे दुसऱया व्यक्तीलाही कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या एटीएम ही काळाची गरज बनली असून एटीएमद्वारे काही मिनीटाच पैसे काढण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यातच आता कोरोना व्हायरसचा प्रभाव सर्वत्र आग ओकत असल्याने त्या भयंकर रोगाच्या बचावासाठी सर्व बँक व एटीएममध्ये सॅनिटाईझरचा वापर करणे अनिवार्य ठरले आहे. मात्र खानापूर शहरात काही एटीएममध्ये सॅनिटाईझरचा वापर करण्यात येत नसून येथील एक्सीस बँक एटीएममध्ये तरी पैसे घेतलेल्या प्रती, मिनी स्टेटमेंट, बॅलेंन्स इन्काँरी आदींचा स्लीप एटीएमच्याबाजुने ढिगाऱयाच्या स्वरुपात जशास तशा पडल्या आहेत. त्यातच काही नागरिकांकडून पान खाऊन एटीएममध्येच थुंकल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे येथील व्यवस्थापकडून दुर्लक्ष केले जात आहे.
ग्राहक सॅनिटायझरविना एटीएम रुममध्ये प्रवेश करत आहेत. एटीएम बटण व स्क्रीनला स्पर्श करुन रोख पैसे काढणे अथवा जमा करत आहेत. मात्र कोणत्याही व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढल्यास ती इतर वापरकर्ता ग्राहकांसाठी धोकादायक ठरु शकते याकडे मात्र बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असून ही बाब बँक व्यावस्थापकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. राज्यशासनाने सर्व संस्था व कंपन्यांना सॅनिटायझरची व्यवस्था करण्याची सुचना करुन देखील बँक व्यवस्थापकांकडून हलगर्जीपणा बाळगण्यात येत आहे. यामुळे अशा महामारीचा प्रसार रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे लवकरात लवकर खानापूर शहरातील एटीएममध्ये सॅनिटाईजर ठेवावे व नियमित येथील एटीएमची स्वच्छता राखावी अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.