पुन्हा जिल्हा अधिकारी-जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
खानापूरमध्ये तसेच परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी दिल्या. तक्रार दिली म्हणून एका बोगस डॉक्टराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विरोधात तक्रार दिली आहे. मात्र पोलिसांनी संबंधित बोगस डॉक्टरांवर कोणतीच कारवाई केली नाही. तेंव्हा त्या डॉक्टरावर कारवाई करावी, याचबरोबर इतर बोगस डॉक्टरांवरही कारवाई करा, अशी मागणी पुन्हा एकदा खानापूर येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोगस डॉक्टरांमुळे अनेकांना मोठा त्रास झाला आहे. त्यामुळे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र तत्कालीन तालुका अधिकारी संजीव डुमगोळ यांनी त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस डॉक्टर असल्याची त्यांनी कबुली दिली होती. मात्र त्यांनी कारवाई केली नाही. अशा डॉक्टरांमुळे अनेकांचे जीव धोक्मयात आले आहेत. प्रकाश मारुती बेतगौडा या बोगस डॉक्टरांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे त्याने धमकी देऊन आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला
आहे. खानापूरच्या पोलीस स्थानकांकडे निरीक्षकांना याबाबत तक्रार दिली होती. तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेंव्हा आता संबंधीत डॉक्टरांवर कारवाई करा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी गेविंद किरमटे, विनोद नाईक, विश्वनाथ पाटील, मारुती पाटील, वैष्णवी पाटील, महेश तोरगल, रामचंद्र पाटील, विनायक नारळकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.