रोहितचाही बुधवारी पहाटे मृतदेह आढळला : सोबत असलेल्या मुलांनी खरी माहिती लपविली, मृतदेह शोधासाठी अथक परिश्रम
वार्ताहर /खानापूर
खानापूर दुर्गानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागे दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या एका मुलाचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी सापडला होता. पण रोहित पाटील या मुलाचा मृतदेह बुधवारी पहाटे नदीपात्रात तरंगताना दिसून आला. या दोन मुलांच्या दुर्दैवी मृत्युमुळे दुर्गानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रोहित आणि श्रेयस हे दोघे अन्य पाच मित्रांसह मलप्रभा नदीकाठावर नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी अंघोळीला गेले असता पोहता येत नसल्याने दोघे पाण्यात बुडाले. दोन्ही मुले सोमवारी दुपारनंतर बेपत्ता झाल्याने सर्वत्र शोधशोध केली. सोबत असलेल्या मुलांनीही खरी माहिती लपविली. अखेर पोलिसांनी मुलांकडून खरी बाब जाणून घेतली. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागे मोकळय़ा जागेत एक गुराखी शेतकरी दिवसभर जनावरे चारत असताना दुपारपर्यंत त्या ठिकाणी मुलांचा वावर सुरू असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. परंतु नदीपात्रात दररोज मुलांचा घोळका असतो त्यामुळे गुराख्याने याकडे लक्ष दिले नाही. पण पोलिसांनी याबाबत त्या शेतकऱयांकडून माहिती घेतली व त्यासोबत असलेल्या अन्य मुलांना बोलावून त्यांच्याकडून चौकशी केली असता खरा प्रकार उघडकीस आला. सदर मुलाने भीतीपोटी रोहित आणि श्रेयस या दोघांचे कपडे व पायातील चप्पल मातीच्या ढिगाऱयाखाली लपवून ठेवले होते. पण त्या मुलांकडून खरी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रोहित व श्रेयस नदीतच बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला. व लागलीच अग्निशमन दल व काही पोहणाऱया युवकांना पाचारण करून नदीपात्रात शोधाशोध केली. तब्बल दोन तास शोधाशोध करूनही मृतदेह मिळाले नाहीत. शेवटी साडेसहाच्या सुमारास श्रेयस बापशेठ याचा मृतदेह आढळला. पण रोहितचा मृतदेह आढळला नसल्याने रात्रभर काहींनी नदीपात्रात शोध घेतला. सकाळी पुन्हा शोध घेतला. त्यावेळी रोहितचा मृतदेह पाण्यात दिसला. मृतदेह काढून खानापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
दुर्गानगर परिसरातील नागरिकांनी त्या दोन बालकांच्या शोधासाठी अथक परिश्रम घेतले. त्यासोबत असलेल्या बालकांनीही पालकांची दिशाभूल केल्यामुळे नेमका प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. अखेर पोहण्यास गेलेल्या त्या बालकांचा मृत्यू बुडून झाल्याचे कळताच एकच आक्रोश झाला. बैलहोंगल विभागाचे अतिरिक्त पोलीस शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खानापूरचे उपनिरीक्षक शरणेश जॅली आणि गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक संगमेश कारजोल व अन्य पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनीही शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न हाती घेतले.
शाळेला सुटी असल्याने मुले झाली बेफाम…
कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे शाळांचे व्यवस्थापनच बिघडले आहे. शाळकरी मुले आता पालकांच्या हातातही राहिली नाहीत. एरव्ही शाळेत मुलांवर शिक्षकांचा असणारा वचक नसल्याने मुलांवर आता नियंत्रण ठेवणे पालकांना अवघड झाले आहे. अनेक पालक मुलांवर नजर ठेवून त्यांना समज देत असले तरी गेल्या वर्षभरापासून शाळेचा दरवाजाच उघडला नसल्याने शाळकरी मुले पालकांच्याही हातात राहिली नाहीत. आपल्या मित्रांसमवेत भटकताना दिसत आहेत. लॉकडाऊन काळात अनेक शाळकरी मुले कुटुंबाच्या सानिध्यात होती. पण आता अनलॉकनंतर अनेक मुलांनी घराबाहेर फिरणे पसंद केले आहे. अशाचप्रकारे दुर्गानगरमधील सदर बालके जवळच असलेल्या मलप्रभा नदीकाठावर फिरायला गेली असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर नदीघाट परिसर धोकादायक असून या ठिकाणी अनेकवेळा अपघात घडले आहेत. तरीदेखील अशा धोकादायक ठिकाणी लहान मुले आंघोळीसाठी जातात, हे चुकीचे आहे.