तालुका भाजप शिष्टमंडळाची नव्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे रस्ते, पूल, शाळा, इमारती तसेच शेतीवाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे निवारण करण्यासाठी खानापूर तालुक्याला विशेष अनुदान मंजूर करावे, अशी मागणी तालुका भाजपच्या शिष्टमंडळाने नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची बेंगळूर येथे भेट घेऊन केली आहे.
यावेळी तालुक्यातर्फे बसवराज बोम्माई यांचा सत्कार केला. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले होते. या शिष्टमंडळात तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, माजी जि. पं. सदस्य बाबुराव देसाई व जोतिबा रेमाणी, राज्य वन विकास निगमचे संचालक सुरेश देसाई, धनश्री सरदेसाई, नगरसेवक आप्पय्या कोडोळी, माजी ता. पं. सदस्य अशोक देसाई, गुंडू तोपिनकट्टी, किरण येळ्ळूरकर व इतरांचा समावेश होता.
तालुक्यात अतिवृष्टीमुळे राज्यमार्ग, जिल्हा मार्ग तसेच जि. पं. अखत्यारीतील रस्त्यांची दूर्दशा झाली आहे. तसेच अनेक मार्गावरील नदी नाल्यावरील पुलानाही धोका निर्माण झाला आहे. महापुराचे पाणी घुसून, डेंगराची माती घसरुन शेतीवाडीचेही नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. ही सर्व परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तालुक्याला विशेष अनुदान मंजूर केल्याशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचारविनिमय करुन महापुरामुळे खानापूर तालुक्यावर ओढवलेल्या संकटाचे निवारण करण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री उमेश कत्ती, मंत्री मंगेश निराणी यांचीही भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.