प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहर परिसरात लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सकाळी 8 ते 12 या वेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला, दूध विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. बुधवारपासून शहरात येण्या-जाण्यासाठी केवळ राजा शिवछत्रपती चौकातील मार्ग खुला ठेवण्यात आला असून शहरात येणारे 19 लहान-सहान मार्ग सीलडाऊन करण्यात आले आहेत.
खानापूर शहरातून बेळगाव-पणजी महामार्ग तसेच जुना बेळगाव-यल्लापूर राज्यमार्ग जातो. या दोन्ही मार्गांतून शहरात येण्यासाठी जवळपास 20 लहान-मोठे मार्ग आहेत. त्यापैकी राजा शिवछत्रपती चौकातून येणारा मुख्य मार्ग शहरात येण्या-जाण्यासाठी खुला ठेवण्यात आला असून निंगापूर गल्ली, नावेचा रस्ता, जुना मोटार स्टँड रस्ता, गदगा लक्ष्मी मंदिराजवळील रस्ता, पारिश्वाड क्रॉस, चौराशी गल्ली, केंचापूर गल्ली, ग्रीन रस्ता, वर्दे कॉलनी मार्ग सीलडाऊन करण्यात आला आहे. बेळगावहून येणाऱया शहरांतर्गत महामार्गावर हलकर्णी ते जांबोटी क्रॉसपर्यंत एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. यामुळे आता शहरांतर्गत वाहतुकीवर बरेच नियंत्रण येणार आहे.
मात्र, बुधवारी एक रस्ता वगळता सर्वच रस्ते अचानक बंद केल्याने कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे का? अशी चर्चा सुरू झाली होती. पण या चर्चेला कोणताही अर्थ नव्हता. कारण खानापूर शहर तसेच तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसले तरी यापुढील काळात या रोगाचा कोणत्याही प्रकारे फैलाव होऊ नये यासाठीच लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
पिरनवाडी, येळ्ळूर व हिरेबागेवाडी येथे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या तिन्ही गावातील बरेच लोक व्यवहारासाठी खानापूर शहरात येत असतात. त्यावर नियंत्रण राखता यावे, यासाठीच शहराभोवतालचे रस्ते सीलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.