प्रतिनिधी / खानापूर
खानापूर को-ऑप. बँक संचालक मंडळाच्या एका जागेसाठी रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मारुती बाबुराव पाटील (कौंदल) यांनी विजय मिळविला. सत्तारुढ मंडळाने पाठिंबा दिलेल्या अर्जुन नारायण केसरेकर (नंदगड) यांचा त्यांनी पराभव केला. के. के. पाटील यांच्या निधनाने संचालक मंडळाची एक जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने एकूण 664 मतदारांपैकी 545 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी 4.15 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरवातीपासूनच मारुती पाटील यांनी आघाडी संपादन केली होती. यामध्ये मारुती पाटील यांना 322 मते तर अर्जुन केसरेकर यांना 206 मते पडली. तर कृष्णा पाटील यांना 9 व रवी पाटील यांना 4 मते मिळाली. तर मतपत्रिकेवर विनोद पाटील व संतोष हंजी यांची देखील नावे होती. पण त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतल्याने त्या दोघांना एकही मत पडले नाही. त्यामुळे चार मते बाद झाली. मतमोजणीनंतर निवडणूक अधिकाऱयांनी मारुती पाटील विजयी झाल्याचे घोषित करताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. खानापूर को-ऑप. बँकेच्या स्थापनेमध्ये ज्या मूळ 13 गावांचा समावेश होता. त्यामध्ये कौंदल गावही आहे पण या गावाला गेली 27 वर्षे संचालक मंडळात प्रतिनिधीत्व नव्हते. पण मारुती पाटील यांच्यामुळे संचालक मंडळात पुन्हा एकदा कौंदलला प्रतिनिधीत्व मिळाले आहे. या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.