प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रात्रीच्या वेळी दारूचा अड्डा : क्रीडाखात्याने लक्ष घालण्याची मागणी : गैरधंद्यांना आळा घालणे आवश्यक
खानापूर : खानापूर शहराजवळ अथक प्रयत्नांतून तालुका क्रीडांगणाचे स्वप्न साकार झाले. क्रीडांगण होऊन बरीच वर्षे लोटली. पण त्याला सध्या कुणीच वाली नसल्याने क्रीडांगणाचा परिसर म्हणजे मद्यपींचा अड्डा बनला आहे. सूर्य मावळला आणि अंधार पडला की, मद्यपी या मैदानात जमा होऊ लागतात. रात्री उशिरापर्यंत मद्यपान करतात. रिकामी बाटल्या व इतर साहित्य तेथेच अस्ताव्यस्त टाकतात. काहीजण तर काचेच्या बाटल्या फोडतात. त्यामुळे क्रीडांगणावर काचा पसरलेल्या असतात. पहाटे फिरणारे लोक तसेच क्रिकेट व इतर खेळाडूंना जखमा होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. इतरही काही अवैध कामासाठी त्या क्रीडांगणाचा उपयोग करून घेतला जात आहे. पण याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या क्रीडांगणाला कुणी वालीच नसल्यासारखे झाले आहे.
वास्तविक सदर मैदान युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या ताब्यात आहे. पण त्या खात्याचा एकही अधिकारी मैदानाकडे फिरकतच नाही. पूर्वी तालुका पंचायत कार्यालयातच तालुका युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या अधिकाऱयांचा कक्ष होता. त्यांच्या हाताखाली दोन-तीन कर्मचारीही राहत होते. पण गेली काही वर्षे तालुका युवजन सेवा आणि क्रीडा अधिकाऱयाचे पदही रिक्त आहे. या सर्व परिस्थितीमुळे या क्रीडांगणाच्या व्यवस्थेला कुणी वालीच नसल्यामुळे तालुका क्रीडांगणाची दूरवस्था झाली आहे.
हे सर्व प्रकार रोखण्यासाठी मैदानावर रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशझोताचा लाईट बसविल्यास या प्रकाराला आळा बसेल. याबाबत नगरपंचायतीशी संपर्क साधला असता या भागातून स्ट्रीट लाईट व्यवस्था नसल्याने आम्ही या ठिकाणी लाईटची सोय करू शकत नाही. यासाठी प्रथम या भागात स्ट्रीट लाईटची सोय केली पाहिजे.
क्रीडांगणाच्या परिसरात हायस्कूल, कॉलेज, बीईओ ऑफीस, सर्टीफाईड हायस्कूल आहे. या क्रीडांगणावर वेळोवेळी क्रिकेट स्पर्धा भरविल्या जातात. क्रिकेट स्पर्धा सुरू असताना दिवसभर स्पीकर मोठय़ा आवाजात लावण्यात येतो. षटकार व चौकार मारल्यावर या ठिकाणी जोरदार जल्लोष केला जातो. दिवसभर सामन्यांचे समालोचनही करण्यात येते. या परिसरात शाळा व कॉलेज असल्याने या क्रीडांगणावर स्पर्धा भरविताना स्पीकरचा वापर करण्यास अजिबात परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे.
युवजन खात्याचे मारुती गणाचारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या ठिकाणी शिपाई नेमण्यात आलेला आहे. वारंवार पोलीस प्रशासनाकडे याबाबत आम्ही तक्रारही केली आहे. पोलीस केव्हातरी कारवाई करतात. त्यानंतर काही दिवस हे इप्रकार थांबतात. नंतर मद्यपी पुन्हा या क्रीडांगणाचा वापर करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी लाईट व्यवस्था होणे गरजेचे आहे.
या प्रकारांनी मन व्यथित होते
तालुका क्रीडांगण व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. आमदार रेमाणी यांच्या प्रयत्नातून खानापूरसाठी हे भव्य क्रीडांगण निर्माण करण्यात आले. याचा वापर क्रीडापटू तयार होण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्या चाललेले प्रकार पाहून मन व्यथित होते. युवजन सेवा खाते व नगरपालिकेने तातडीने याबाबत क्रम घेणे गरजेचे आहे. याला आळा घालण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून क्रीडांगणाचे उर्वरित कामही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू.
-प्रकाश चव्हाण