प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यातील लहान व मध्यम शेतकऱयांचा आर्थिक विकास समोर ठेवून माजी आमदार कै. बी. एम. सानिकोप यांनी 1968 साली खानापूर तालुका प्राथमिक भू-विकास, ग्रामीण अभिवृद्धी बँकेची स्थापना केली. बँकेने गेल्या 65 वर्षात शेतकऱयांच्या उन्नतीसाठी विविध कर्ज योजना राबवून त्या यशस्वी केल्या आहेत. सध्या बँक शेती कर्जाबरोबर कृषी यंत्रसामुग्री व संबंधित दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या योजनांनाही कर्ज उपलब्ध करीत आहेत. याचा शेतकरी सभासदानी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी सर्वसाधारण सभेत बोलताना केले.
सध्या शेती व्यवसायावर येणाऱया संकटामुळे शेतकऱयांना बँकेचे कर्ज वेळेत भरता आले नाही. पण यानंतर शेतकऱयांनी उत्पन्नात वाढ करुन
कर्जाची वेळेत परतफेड करावी, यामुळे बँकेच्या कर्ज वितरणाची क्षमता वाढवून त्याचा उपयोग इतर शेतकरी सभासदाना करुन देता येईल, असेही त्यांनी आवाहन केले. सध्या बँकेचे भागभांडवल 83 लाख 24 हजार इतके आहे. बँकेचा राखीव निधी 4 लाख 17 हजार आहे. 91 लाख 7 हजार इतका इतर निधी आहे. बँकेने शेतकऱयांना विविध योजनेखाली 6 कोटी 69 लाख 42 हजार कर्जवाटप केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी बँकेचे व्यवस्थापक पी. जे. उपाध्ये यांनी स्वागत करुन बँकेच्या मागील बैठकीचे इतिवृत्त, नफा-तोटा, ताळेबंद सादर केला. यावेळी उपस्थित सभासद शेतकऱयांनी विचारलेल्या प्रश्नाला चेअरमन मुरलीधर पाटील यांनी उत्तरे दिली. सभासदानी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची त्यांनी ग्वाही दिली. बैठकीला व्हा. चेअरमन व्ही. एम. पाटील, संचालक एस. बी. पाटील, ए. बी. पाटील, आर. एच. पाटील, एस. एन. गुरव, एन. एन. पाटील, एस. एल. गावकर, व्ही. पी. कुंभार, डी. बी. कांबळे,. के. यू, बिच्चन्नावर, व्ही. टी. डिचोलकर, सौ. एल. एस. पाटील, श्रीमती एस. एस. मडीवाळकर व बँकेचे सभासद शेतकरी उपस्थित होते. संचालक अशोकगौडा पाटीलनी आभार मानले.