राज्य शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत : योजना मार्गी लावण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांचे प्रयत्न सुरूच
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यात गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टी झाली. यामुळे नदी-नाल्यांतील पाणीपातळीत वाढ झाली. सध्या तालुक्यात नदी-नाल्यांमध्ये पाणी आले असले तरी या पूर्वीचा अनुभव पाहता उन्हाळा सुरू झाला की तालुक्यातील मलप्रभा, पांढरी, मंगोत्री आदी नद्यांसह त्यांना जोडणारे नालेदेखील पाण्याविना कोरडे असतात. तसे पाहिल्यास तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. पण ऐन उन्हाळय़ात त्याच पश्चिम भागातील जनतेला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत उन्हाळय़ातदेखील पाणीसाठा उपलब्ध रहावा यासाठी बंधारे, चेकडॅम यासारख्या योजना अंमलात आल्या. तरीदेखील त्या योजनांचे योग्य नियोजन होत नसल्याने तालुक्याच्या बहुतेक भागात उन्हाळय़ात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर मात करण्यासाठी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी राज्य शासनाला 2018-19 सालच्या अर्थसंकल्पात नदी-नाल्यांतील बंधाऱयासह तलावभरणी योजनेचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर योजनेंतर्गत तालुक्यात विशेषतः पूर्वभागात असलेल्या अनेक तलावांमध्ये भूजलपातळी वाढावी यासाठी तलावभरणी योजनेचा समावेश होता. यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 75 कोटीची योजना राज्य शासनाला सादर करून त्याचा पाठपुरावाही केला. याचा परिणाम म्हणून 2018-19 च्या अंदाजपत्रकात तत्कालीन काँग्रेस-निजद शासनाने पहिल्या टप्प्यामध्ये 45 कोटीची तरतूदही केली. तसेच दुसऱया टप्प्यात उर्वरित अनुदान मंजूर करण्याचेही आश्वासन दिले. पण तेवढय़ातच राज्यामध्ये संत्तातर घडले. काँग्रेस पक्षाच्या 15 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यशासन अल्पमतात आले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, निजद, युती शासनाने राजीनामा दिला. यानंतर राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने त्यावेळी येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप शासन सत्तेवर आले. पण त्या शासनाने अर्थसंकल्पातून काँग्रेस, निजद, युती शासनाच्या बऱयाच योजना वगळल्या. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील तलावभरणी योजनादेखील होती. केवळ राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रयत्न करूनही तलावभरणी योजना रखडली. दुसरीकडे 2020 व 2021 अशा दोन्ही वर्षी अतिवृष्टीमुळे महापूर आला. या महापुरात तालुक्यातील हजारो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले. जमिनी वाहून जावून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. पण यामध्येही मार्ग काढून गेल्या दोन वर्षांत होणारे नुकसान टाळण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला काही योजनांचे प्रस्ताव पाठविण्यात आले. त्यामध्ये खानापूर शहराजवळील वसाहतीमध्ये घुसणाऱया महापुराच्या पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी दुर्गानगर वसाहतीजवळ असणाऱया नाल्याच्या दोन्ही बाजूला 400 मीटर लांबीची आणि 12 मीटर उंचीची संरक्षक भिंत बांधणे तसेच खानापूरच्या नवीन पूलवजा बंधाऱयात शहराजवळील रस्त्याची उंची वाढवून कुप्पटगिरी क्रॉसपर्यंत रस्त्यांची उंची वाढविणे या दोन प्रमुख योजना होत्या. त्याचाही आमदार अंजली निंबाळकर यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या दोन योजना मंजूर झाल्यास खानापूरच्या दुर्गानगर व मारुतीनगर वसाहतीमध्ये महापुराचे पाणी घुसून होणारे नुकसान टाळता येऊ शकते. याचाही पाठपुरावा सुरूच आहे.
आमगावच्या पूलवजा बंधाऱयाला वनखात्याची आडकाठी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील आमगावला जाणाऱया मार्गावर 2 कोटी खर्च करून पूलवजा बंधाऱयाची योजनाही मंजूर झाली आहे. यामुळे रस्त्याबरोबरच बंधाऱयातील पाण्यामुळे आमगावातील शेतीवाडीला त्याचा लाभ होणार आहे. ही योजना मंजूरदेखील झाली आहे. पण वनखात्याने मंजूर झालेल्या योजनेत आडकाठी आणल्याने गेल्या दोन वर्षांपासून पूलवजा बंधाऱयाची योजना रखडली आहे. वास्तविक या पुलामुळे किंवा रस्त्यामुळे वनसंपत्तीचे कोणतेही नुकसान होणार नाही. उलट बरीच वर्षे अत्यंत अडचणीत असलेल्या आमगावला बारमाही रस्त्यासह इतर सुविधादेखील मिळणार आहेत. वास्तविक वनखात्याने एखाद्यावेळी त्या पूलवजा बंधाऱयामुळे वनसंपत्तीचे नुकसान होत असल्यास ते काम बंद पाडले असते. पूलवजा बंधाऱयामुळे वनसंपत्तीचे नुकसान होणारच नाही. शिवाय आमगावला बारमाही रस्ता झाल्याने त्या दुर्गम गावाला विकासाची नवी चालना मिळणार आहे. सध्या योजना रखडली असली तरी ती मार्गी लावण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय त्यांच्या प्रयत्नातूनच शिरोली व तालुक्यातील इतर ठिकाणी पूलवजा बंधारे मंजूर झाले आहेत.
60 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार
खानापूर तालुक्यात बिडी, मोदेकोप, नंदगड गावासाठी बहुग्राम पाणी योजना मंजुरीचा पाठपुरावादेखील आमदार अंजली निंबाळकर यांनी सुरूच ठेवला आहे. या बहुग्राम पाणी योजनेमुळे बिडी, नंदगड, मोदेकोप भागातील जवळपास 60 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या योजनेचा प्रस्तावदेखील गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. सततच्या पाठपुराव्यामुळे आता लवकरच तिन्ही गावांची बहुग्राम पाणी योजनाही मार्गी लागणार आहे.
171 गावांसाठी 60 कोटीचा निधी मंजूर
खानापूर तालुक्यातील 171 गावांसाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत 60 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 41 गावांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर दहा गावांचे योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू आहे. उर्वरित योजनाही टप्प्याटप्प्याने मंजूर होणार आहेत.
योजना मंजुरीचे प्रयत्न सुरूच ठेवणार
यासंदर्भात तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे तलावभरणी अतिवृष्टीपासून होणारे नुकसान टाळणारी योजना, आमगावचा पूलवजा बंधारा यासारख्या महत्त्वाच्या योजना कुठल्याही परिस्थितीत मंजूर झाल्याच पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न सुरूच असून कितीही अडचणी आल्या तरी त्या सर्व योजनांचा योग्यप्रकारे पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेण्यामध्ये मी कमी पडणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली.