खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे वेळापत्रक अखेर सोमवारी जाहीर केले. संपूर्ण राज्यात दोन टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार असून खानापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात म्हणजे दि. 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे आता तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्याने आता निवडणुकीसाठी उभे राहणाऱया इच्छुकांच्या हालचालींनाही वेग आला आहे.
खानापूर तालुक्यात एकूण 51 ग्राम पंचायती असून त्यामध्ये नंदगड, लोंढा, बिडी, गर्लगुंजी, पारिश्वाड आदी चार स्वतंत्र ग्राम पंचायती आहेत. बाकीच्या 47 ग्राम पंचायतींमध्ये दोनहून अधिक गावांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार 7 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 11 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर दि. 12 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 14 डिसेंबर राहणार असून यानंतरच तालुक्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यात एकूण 51 ग्राम पंचायतींमध्ये सदस्यांच्या 655 जागांसाठी हे मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत एकूण 620 जागा होत्या. यावर्षी त्यामध्ये 35 जागा वाढल्या आहेत.
म. ए. समिती, भाजप, काँग्रेस पक्षाच्या हालचाली सुरू
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता तालुक्याच्या ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्राम पंचायत निवडणुकात राजकीय पक्षांना थेट भाग घेता येत नाही. यामुळे निवडणुकीत म. ए. समिती, काँग्रेस, भाजप व तालुक्यातील इतर राजकीय पक्ष थेट भाग घेऊ शकत नसले तरी प्रत्येक पक्षांतर्गत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पॅनेल तयार करून अप्रत्यक्षरित्या निवडणुकीत उतरणार आहेत. तर काही गावांमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा असून यावेळी देखील संबंधित गावांतून त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तालुक्यातील एकूण राजकीय चित्र पाहता तालुक्याच्या पश्चिम भागात म. ए. समितीविरुद्ध भाजप असाच अंतर्गत सामना होण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने म. ए. समितीबरोबरच भाजपने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. तर पूर्व भागात भाजपविरुद्ध काँग्रेस अशाच अंतर्गत लढती होणार आहेत. एकूण तालुक्यामध्ये आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी म. ए. समिती, भाजप व काँग्रेस आदी तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तर काही ग्रा. पं. मध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास आघाडय़ा स्थापून निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
यापूर्वी ग्राम पंचायत निवडणुकींचे आरक्षण जाहीर झाल्यापासूनच काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या हालचाली सुरू केल्या असून वॉर्डामधील मतदारांचे मत आजमावण्यास सुरुवात केली होती. तर काहींनी आरक्षण जाहीर झाल्यापासूनच मतदारांना आर्कषित करून घेण्यासाठी मेजवानीचा सपाटा सुरू केला आहे. तालुक्यात काही ग्राम पंचायतींमध्ये इतकी चुरस होणार आहे की, त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही..