खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना महापूर आला होता. या महापुरात शेतीवाडीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पण यानंतर पावसाचा जोर ओसरला. आता उन्हाळी हवामान तयार झाले आहे. आता पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील बंधारे-पुलांवरील पाणी तर ओसरलेच शिवाय नदी-नाल्यांतील पाण्याची पातळीही खाली आली आहे.
शेतीवाडीत पाणी कमी झाल्याने शेतकरीवर्ग पुन्हा मोठय़ा पावसाची प्रतीक्षा करीत आहे. खानापूर तालुक्यात भात रोपाची लागवड सुरू असतानाच अतिवृष्टी व महापुराचा तडाखा बसला. यामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील शेतीवाडीत पाणी घुसून भात पीक पूर्णतः वाया गेले. यानंतर काही शेतकऱयांनी भातरोप लावण्याचा प्रयत्न केला. पण पाऊस अचानक गेल्याने अडीचणी निर्माण झाल्या. अशा वेळी नदी-नाल्यांतील पाणी उपसा करण्यावाचून शेतकऱयांना पर्याय नव्हता. पण नदी-नाल्यांभेवताली दोन्ही बाजूला असलेले अनेक ठिकाणचे विद्युत खांब व ट्रान्स्फॉर्मरही मोडून पडल्याने बऱयाच शेतीवाडीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज नसल्याने नदी-नाल्यांतील पाणी कसे उपसा करणार, असा प्रश्न शेतकऱयांना पडल्याने त्यांनी रोपे लावण्याचे काम सोडून दिल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आता हेस्कॉमने झालेला नुकसानीचा आराखडा तयार करून पुन्हा एकदा पडलेले विद्युत खांब, ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी धडपड सुरू केली असली तरी त्यासाठी आवश्यक निधी तसेच नवीन विद्युत खांब व ट्रान्स्फॉर्मर आणण्यासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शेतीवाडीतील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यास थोडा विलंब लागणार आहे. यामुळे शेतकऱयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांना आता शेतीवाडीत पाणी होण्यासाठी मोठय़ा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. येत्या दोन-चार दिवसात मोठा पाऊस झाला तरच तो शेतकऱयांना फलदायी ठरणार आहे. पण असेच हवामान राहिल्यास भात पिकावर रोग येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी माळरानावरील पिके अतिवृष्टीमुळे बऱयाच प्रमाणात खराब झाली आहेत.
यावर्षी उसाचे पीक साधारण असले तरी नदी नाल्याला लागून असलेल्या शेतीवाडीतील ऊस पिकाचे मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी अद्याप शेतकऱयांना एक पैसाही नुकसानभरपाई मिळालेली नाही.