प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार दिनांक 29 जानेवारी रोजी होणार आहे. तालुक्यातील 9 ग्रामपंचायत अनुसूचित जाती आणि 17 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 38 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. शुक्रवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आरक्षण सोडत होईल, अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
सरपंचपद आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे. सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा दिवस निश्चित झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या 13 ग्रामपंचायतीसह तालुक्यातील 64 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
खानापूर तालुक्यातील 13 गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यावेळी प्रथमच सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होत असल्याने ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तालुक्यातील 64 पैकी 9 ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असेल. यापैकी पाच महिला असतील. 17 ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत. यापैकी 9 ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी असणार आहे. उर्वरित 38 ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. यापैकी 19 ग्रामपंचायतीत सरपंचपद महिलांसाठी असणार आहे. 64 पैकी एकूण 33 ग्रामपंचायतीत सरपंच महिला असणार आहेत.