प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात लॉकडाऊन काळात क्वारंटाईन झालेल्यांची संख्या संपूर्ण जिल्हय़ात अधिक आहे. त्या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीही अद्याप 400 जणांचे स्वॅब अहवाल यायचे असून एक-दोन दिवसात ते अहवाल येणार आहेत. यामुळे त्या अहवालांबद्दल तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला धास्ती लागली आहे.
आतापर्यंत बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. पण या बाबतीत खानापूर तालुका आतापर्यंत तरी नशीबवान ठरला आहे. याला मुख्य कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील महसूल खाते, पोलीस, डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार यांनी केलेले विशेष प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. त्यातच या प्रयत्नाला तालुक्यातील जनतेचीही चांगली साथ मिळाली. जनतेकडूनही लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियमांचे व्यवस्थित पालन झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासकीय यंत्रणाही यशस्वी ठरली आहे.