प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यामध्ये 65 गावातील घरनिहाय आरोग्य सर्व्हे पूर्ण झाला आहे. यासाठी तब्बल 248 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. खानापूर तालुक्यात एकूण 8 हजार 593 लोक अन्य ठिकाणावरून प्रवास करून आलेले होते. परदेशातून आलेल्या सर्व लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिली.
याबाबत माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिलेली माहिती अशी, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य यंत्रणेने अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. जगावरील कोरोनाचे संकट अद्यापही पूर्ण नष्ट झाले नाही. नागरिकांनी सतर्क व सजग राहणे गरजेचे आहे. गावात कोणीही बाहेरून आले, संशयित आढळला अथवा सदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन माजी उपाध्यक्ष बाबर यांनी केले.
गेले दीड महिना देशावर आणि महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेच्या कामाला अनन्य साधारण महत्व आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. तालुक्यातील 65 गावातील गावनिहाय व घरनिहाय आरोग्य सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. 10 वैद्यकीय अधिकारी,10 आरोग्य सहाय्यक अधिकारी, 3 औषध निर्माण अधिकारी, 4 प्रयोगशाळा अधिकारी, 13 आरोग्य सेवक, 34 आरोग्य सेविका, 2 कनिष्ठ सहाय्यक, 3 वाहनचालक, 8 परिचर, 25 स्त्री परिचर, 7 गट प्रवर्तक, 122 आशा वर्कर व इतर 7 कर्मचारी अशा आरोग्य विभागाच्या 248 लोकांनी अहोरात्र मेहनत घेत प्रत्येक गावातील घराघरात जाऊन आरोग्य सर्व्हे केला आहे, असे बाबर यांनी सांगितले.
खानापूर तालुक्यातुन व्यवसायानिमित्त परराज्यात स्थायीक असलेल्या लोकांची संख्या खूप आहे. परराज्यातून एक हजार 378 लोक तालुक्यात परतले आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यातून 7 हजार155 लोक आले आहेत. विदेशातून तालुक्यात जवळपास 60 लोक आले होते. खानापूर तालुक्यात एकूण 8 हजार 593 लोक अन्य ठिकाणावरून प्रवास करून आलेले होते. परदेशातून आलेल्या सर्व लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी 32 लोकांचा होम क्वारंटाईन आज संपला आहे, तर उर्वरीत लोकांचा येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. परराज्यातील कामगार लोकांना त्यांचे घरी न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात कोणीही बाहेरून आला अथवा संशयित आढळला अथवा सदृश्य कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.