भाग्यलक्ष्मी सोसायटी, बजंरग दल, श्रीराम सेना आदी संघटनांकडून रुग्णवाहिकांची सेवा सुरू
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात एकेकाळी एकही रुग्णवाहिका नव्हती. एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागले तर बेळगावहून रुग्णवाहिका मागावी लागत होती. पण आता तालुक्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढली असून सरकारची 108 रुग्णवाहिका सोडून आतापर्यंत विविध संस्थांच्या चार रुग्णवाहिका सेवेसाठी रुजू झाल्या असून येत्या काही दिवसात आणखी चार रुग्णवाहिका तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत.
साधारण 30 वर्षापूर्वी नंदगड येथील खानापूर तालुका शेतकी उत्पादक सहकारी संघाने रुग्णवाहिका ठेवली होती. पण काही वर्षाच्या सेवेनंतर ती रुग्णवाहिका कालबाहय़ झाली. यानंतर बरीच वर्षे रुग्णवाहिका नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन खानापूरच्या भाग्यलक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीने 2002 साली रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका आणली. या रुग्णवाहिकेमुळे तालुक्यातील रुग्णांची बरीच सोय झाली. भाग्यलक्ष्मी संस्थेने जवळपास 15 वर्षे रुग्णवाहिका ठेवली होती. पण तालुक्यात सरकारने 108 रुग्णवाहिका दिल्यामुळे भाग्यलक्ष्मीच्या रुग्णवाहिकेचा भार कमी झाला. यामुळे 2017 साली भाग्यलक्ष्मी सोसायटीने रुग्णवाहिका बंद ठेवली. यानंतर जनता दलाचे युवा कार्यकर्ते अलीम अख्तर नाईक यांनी एक रुग्णवाहिका आणून त्याद्वारे रुग्णसेवा सुरू ठेवली आहे. तर आता कोरोना संसर्गाच्या काळात काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील जनतेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्यावतीने तालुक्यातील बजरंग दल कार्यकर्त्यांना रुग्णसेवा करण्यासाठी 2 रुग्णवाहिका दिल्या असून त्यांचे कार्य आता सुरू आहे.
आणखी रुग्णवाहिका सेवेत येणार
बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने खानापूर शाखेसाठी रुग्णवाहिका दिली असून त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आता सेवा चालू केली आहे. तर देसाई गल्लीतील बालमंडळ-भगवा रक्षक संघटनेने विविध सामाजिक संस्था व धनीकांच्या अर्थसहाय्यातून हायटेक रुग्णवाहिका तयार केली असून त्याचे लोकार्पणही येत्या एक दोन दिवसात होणार आहे. तसेच आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्याकडूनही लवकरच तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये दोन रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी तर एका रुग्णवाहिकेचा उपयोग शववाहिका म्हणून केला जाणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे राज्यउपाध्यक्ष के.पी. पाटील हे देखील एक रुग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे आता तालुक्यात नजिकच्या काळात एकप्रकारे रुग्णवाहिकेचा सुकाळच होणार आहे.