ग्राम पंचायत निवडणुकीत पश्चिम भागात म. ए. समिती, पूर्व भागात भाजप तर काही पंचायतींवर अपक्षांची आघाडी : रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचे काम सुरूच
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील 51 ग्राम पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी 8 वा. सर्वोदय विद्यालयात सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचे काम सुरूच होते. रात्री 8.30 पर्यंत लागलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीचा कल लक्षात घेता पश्चिम भागातील बहुतांशी ग्राम पंचायतींवर म. ए. समितीची सत्ता आली आहे. तर पूर्व भागातील अधिकाधिक पंचायती भाजपकडे गेल्या असून काही ग्राम पंचायतींवर स्थानिक आघाडय़ांनी कब्जा केला आहे.
मतमोजणीसाठी एकूण तीन फेऱया करण्यात आल्या होत्या. पहिल्या फेरीचे निकाल दुपारी 2 पर्यंत लागले. दुसऱया फेरीला 3 वा. सुरुवात झाली. तर तिसऱया फेरीला सायंकाळी 7 नंतर सुरुवात झाली. यावेळच्या निकालात काही पंचायतींमध्ये सामान्य जागांवर उभ्या असलेल्या उमेदवारांपेक्षा राखीव जागांवर उभारलेल्या उमेदवारांनी ज्यादा मते घेतल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे.
तालुक्यातील कक्केरी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते. गेली काही वर्षे एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या ऍड. सी. बी. अंबोजी व रियाज पटेल यांनी एकत्रित येऊन यावेळी पॅनेल उभे केले होते. त्यामध्ये ते दोघेही उमेदवार होते. पण चारच दिवसांपूर्वी ऍड. सी. बी. अंबोजी यांचे आकस्मिक निधन झाले. यामुळे या निवडणुकीत सी. बी. अंबोजी यांचा निकाल काय लागेल, याबद्दल चर्चा सुरू होती. त्यामध्ये ऍड. सी. बी. अंबोजी व रियाज पटेल दोघेही विजयी झाले. तसेच 13 पैकी 11 जागी त्यांच्या पॅनेलचेच उमेदवार विजयी झाले. पण आता ऍड. सी. बी. अंबोजी यांच्या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. कडतन बागेवाडी मतदारसंघातील तोलगी गावच्या वॉर्डातील विजयी सामान्य गटातील उमेदवारांनी गावात जाऊन आनंदोत्सव केला. पण प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर दोन्ही सामान्य उमेदवारांपेक्षाही महिला उमेदवाराला अधिक मते पडल्याचे मतमोजणीत दिसून आल्याने त्या ठिकाणीही सामान्य जागेवरच राखीव उमेदवारांचा विजय झाला. पण याची कल्पना नसल्याने सामान्य गटात अधिक मते पडल्याने आपण विजयी झालो, असे त्या उमेदवाराला तसेच त्याच्या पाठीराख्यांना वाटले. यामुळे त्यांनी आनंदोत्सव व्यक्त केला होता. पण त्या आनंदोत्सवावर अखेर पाणी फिरले.
शिंदोळी ग्राम पंचायतीमधील होनकल गावच्या वॉर्डमधील दोन जागांपैकी एक जागा सामान्य महिलेला व एक जागा सामान्याला होती. पण त्या वॉर्डातही दोन्ही महिलांनाच सामान्यांपेक्षा अधिक मते पडल्याने सामान्य महिलाच विजयी झाल्या. तसेच बरगाव ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील बरगाव वॉर्डातील प्रत्येकी एक जागा सामान्य ब वर्ग व अ वर्ग महिलेला राखीव होती. त्या ठिकाणी अ वर्ग महिलेचा निकाल प्रथम लावण्यात आला. यानंतर ब वर्गाचा निकाल झाला. पण तिसऱया सामान्य जागेसाठी उभारलेल्या उमेदवारापेक्षा ब वर्गातील महांतेश पाटील व निलकंठ पाटील या दोघांना अधिक मते पडली होती. पण दोघांनाही समान मते असल्याने चिठ्ठीचा पर्याय पुढे आला. पण या वॉर्डासाठी चार पोस्टल मते आल्याचे निवडणूक अधिकाऱयांच्या लक्षात आले. यामुळे त्या चार पोस्टल मतांची मतमोजणी झाली. ती चारही मते महांतेश पाटील यांना पडल्याने सामान्य जागेवरही ब वर्गासाठी उभे असलेले महांतेश पाटील चार मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीसाठी बरगाव ग्राम पंचायतीच्या कुप्पटगिरी वॉर्डमधून पद्मश्री पाटील या चार्टर्ड अकाऊंटंट महिला उभ्या होत्या. त्या ही सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. तर गर्लगुंजी ग्राम पंचायत वॉर्डातून प्रसाद पाटील हे बीई सिव्हिल पदवी संपादन केलेले उमेदवार उभे होते. त्यांच्याही गळय़ात विजयाची माळ
पडली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी, पारवाड, गोल्याळी, जांबोटी, निलावडे, आमटे आदी पंचायतींवर म. ए. समितीचा भगवा फडकला. शिंदोळी, करंबळ, हेब्बाळ, बेकवाड, क. नंदगड, नागरगाळी, हलगा, गोधोळी, चापगाव आदी ग्राम पंचायतीत देखील म. ए. समिती कार्यकर्तेच बहुमतांनी निवडून आल्याने त्या ठिकाणीही म. ए. समितीची सत्ता आली. लोंढा ग्राम पंचायतीवर बेन्नी पॅनेलला बहुमत मिळाले. तसेच कापोली ग्राम पंचायतीवर संदीप राजाराम देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता आली. तसेच पूर्व भागातील हिरेहट्टीहोळी, कडतन बागेवाडी, कोडचवाड, देवलत्ती, मंग्यानकोप्प, केरवाड आदी ग्राम पंचायतींवर भाजपने वर्चस्व प्राप्त केले. इटगी, गंदिगवाड या पूर्व भागातील मोठय़ा ग्राम पंचायतींवर अपक्षांची आघाडी सत्तेवर आली.
सर्वोदय विद्यालयाच्या बाहेर सकाळपासूनच निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची एकच गर्दी झाली होती. जसेजसे निकाल जाहीर होऊ लागले, तसा विजयी उमेदवारांच्या समर्थकांत जल्लोष निर्माण झाला. विजयी उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारांनी शिवस्मारकात येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मतमोजणीची व्यवस्था अत्यंत पारदर्शक होती. तहसीलदार रेश्मा तालीकोटी तसेच त्यांचे सहकारी, अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, यु. एस आवटी, संगमेश कारजोळ, सहकारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.