1 लाख 47 हजार 170 मतदारांनी बजावला हक्क : 1719 जणांचे भवितव्य पेटीबंद
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावर्षी उच्चांकी मतदान झाले. तालुक्यात उचवडे येथील मतदान केंद्रात 96.73 टक्के उच्चांकी मतदान झाले असून या गावाने 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीची मतदानाची आघाडी कायम राखली आहे. याठिकाणी केवळ एकूण मतदारांपैकी 12 मतदार परगावी तसेच मयत असल्याने टक्केवारीचे शतक हुकले आहे. तर कक्केरी येथील 216 क्रमांकाच्या केंद्रावर केवळ 48 टक्के निच्चांकी मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ लोंढा येथे दोन मतदार केंद्रावर 52 टक्के तर एका मतदार केंद्रावर 54 टक्के इतकेच मतदान झाले आहे.
तालुक्यात यावर्षीची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. 1719 मतदारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. तालुक्यात 51 ग्रामपंचायतींना 623 सदस्य संख्या असून यापैकी 79 जागा अविरोध झाल्या आहेत. उर्वरित 542 जागांसाठी 1719 उमेदवार रिंगणात होते.
तालुक्यात 276 वॉर्ड आहेत. यासर्व वॉर्डातून 1 लाख 85 हजार 129 मतदार संख्या आहे. यापैकी 1 लाख 47 हजार 170 आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यापैकी 77 हजार 9454 पुरुष मतदारांपैकी 69676 मतदारांनी आपला हक्क बजावला असून तालुक्यात एकुण 79.50 टक्के मतदान झाले आहे.
सर्वाधिक मतदान गोल्याळी केंदावर
तालुक्यात प्रामुख्याने उचवडे नंतर सर्वाधिक मतदान गोल्याळी मतदान केंदावर 94.29, हब्बनहट्टी येथे 93.64, गणेबैल 92. 68 तर कुसमळी, आमटे, नागुर्डा येथे 91 तर काटगाळी, यडोगासह काही मतदान केंद्रावर 90 टक्के मतदान झाले आहे.
मतदान शांततेत
तालुक्यातील एकूण 276 मतदान केंद्रावर सुरळीत मतदान झाले. तालुका प्रशासनाने सदर निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली असून बुधवारी पहाटेपर्यंत खानापूर येथील सर्वोदया विद्यालयात मतपेटय़ा सुरक्षितपणे हाताळण्याचे काम सुरू होते.
आता येत्या 30 तारखेला निवडणूक निकाल असून तालुका प्रशासनानेही याची तयारी सुरू ठेवली आहे.