प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीसाठी विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तालुक्यातील 51 ग्रा. पं. च्या 623 जागांसाठी एकूण 2215 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जांची छाननी शनिवारी झाली. त्यामध्ये जवळपास 31 अर्ज अवैध ठरल्याने आता 2184 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख सोमवार दि. 14 डिसेंबर असून या दिवशी दुपारी 3 नंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
एकूण 623 जागांपैकी इदलहोंड ग्रा. पं. मध्ये असलेल्या अनुसूचित जमाती जागेसाठी एकही अर्ज दाखल न झाल्याने ती जागा रिकामी राहिली आहे. आता उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर गावागावांमधील प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्यासाठी उमेदवारी मागे घ्यावी, असा दबाव त्या वॉर्डातील इच्छूक उमेदवारांकडून आणला जात आहे. तसेच काही वॉर्डातील निवडणुका बिनविरोध करण्यासाठी संबंधित गावकऱयांकडून प्रयत्न केले जात आहेत.
बऱयाच ग्रा. पं. मध्ये राष्ट्रीय पक्षांनी अप्रत्यक्षपणे पॅनेल तयार केली आहेत. तालुक्यातील एकूण उमेदवारी अर्जांची झालेली गर्दी पाहता बऱयाच ठिकाणी चुरशीच्या लढती होणार, अशी चिन्हे दिसत आहेत.