शहरवासियांना होतो अशुद्ध पाणीपुरवठा : जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने तीव्र संताप
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर शहराचा पाणीपुरवठा प्रामुख्याने मलप्रभा नदीवरच अवलंबून आहे. यावर्षी मलप्रभा नदीला पुरेसे पाणीदेखील आहे. यामुळे दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात एक किंवा दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दररोज सुरू आहे. पण नगर पंचायतीच्या बेजबाबदार वृत्तीमुळे शहरवासियांना सध्या अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
खानापूर शहवासियांना पूर्वी पाण्यासाठी बरेच हाल सहन करावे लागत होते. त्या काळात गावात असलेल्या ठराविक विहिरींवरच शहरवासियांना पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते. पण ही अडचण दूर करण्यासाठी त्या काळातील नेतेमंडळांनी अथक प्रयत्नांतून शहरासाठी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. 1974 साली प्रत्यक्षात नळ पाणीपुरवठय़ाला सुरुवात झाली. सुरुवातीची काही वर्षे नदीमधून नळाद्वारे थेट पाणीपुरवठा केला जात होता. पण त्या काळी मलप्रभा नदी प्रदूषित नव्हती. यामुळे थेट पाणीपुरवठा झाला तरी ते पाणी प्यायला चांगले होते. यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पही पूर्ण झाला. यामुळे मलप्रभा नदीच्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते शहरवासियांना दिले जात होते. यामुळे त्या वेळी लोक नळाचे पाणी पिण्यासाठी वापरत
असत.
दूषित पाण्यामुळे अंगाला खाज येण्याचे प्रकार
कालांतराने मलप्रभा नदीचे प्रदूषण वाढले. यामुळे शहरात ठिकठिकाणी कूपनलिका खोदून त्याद्वारे टाक्या उभारण्यात आल्या. कूपनलिकेचे पाणी टाकीमध्ये सोडण्यात येऊ लागले. त्या टाक्यामधून ठिकठिकाणी नळही बसविण्यात आले. यामुळे शहरवासीय आता पिण्यासाठी केवळ कूपनलिकेचेच पाणी वापरतात. मलप्रभेतून नळाद्वारे होणाऱया पाण्याचा उपयोग कपडे धुणे व इतर कामासाठी उपयोगात आणत आहेत. त्यातच आता गेल्या काही महिन्यात जलशुद्धीकरण करण्याकडे नगर पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाल्याने शहरात अत्यंत गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. कपडे धुणेही त्या पाण्यात कठीण झाले आहे. घरोघरी स्नानासाठीही त्याच पाण्याचा उपयोग होतो. पण त्या पाण्यामुळे आता अंगाला खाज येण्याचे प्रकारही वाढले
आहेत.
वास्तविक नगर पंचायतीने जलशुद्धीकरण प्रक्रियेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जलशुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले केमिकल व इतर वस्तूंवर मोठय़ा प्रमाणात खर्च पडतो. पण प्रत्यक्षात जलशुद्धीकरणच होत नाही. नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱयांनी किंवा नगराध्यक्ष व इतर सहकारी नगरसेवकांनी जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे नेहमी लक्ष देणे जरुरीचे आहे. त्यांचे जलशुद्धीकरणाकडे लक्ष आहे की नाही, हेच समजू शकत नाही.
अन्यथा नगरपंचायतीवर मोर्चा
जलशुद्धीकरण करण्याची जबाबदारी असलेल्या नगर पंचायतीच्या कर्मचाऱयांवर कुणाचेच नियंत्रण नाही, असे दिसते. वास्तविक पाणीपुरवठा ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्याकडे विशेष लक्ष असणे जरुरीचे आहे. नाही म्हणायला नगर पंचायतीकडून भरमसाठ पाणीपट्टी आकारण्यात येतो. मग स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न निर्माण होतो. नगराध्यक्ष असोत किंवा मुख्याधिकारी त्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा कशाप्रकारे करता येईल याकडे वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा, नागरिकांना यासाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यावाचून पर्याय राहणार नाही.