विटा : प्रतिनिधी
खानापूर नगरपंचायत निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे आणि स्वबळावर ताकतीने लढणार आहे. या निवडणुकीत जनतेचा भारतीय जनता पार्टीला मिळणारा प्रतिसाद पाहता खानापूर नगरपंचायती मध्ये परिवर्तन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरत आहोत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
खानापूर नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर शहरात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक स्वतंत्रपणे लढण्यासाठी चाचपणी केली असून बहुतांश उमेदवार निश्चित करण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्य प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुण भारत शी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
याबाबत आमदार पडळकर म्हणाले, खानापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने लोकांमधून चाचपणी करून उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. खानापूर मध्ये आम्हाला प्रथमच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे जवळपास 13 ते 14 उमेदवार निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित तीन ते चार जागी तगडे उमेदवार असल्याने लोकांचा कल घेऊन उमेदवार निश्चित करणार आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापुरात लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता, भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. खानापूर नगर पंचायतीची निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर आणि ताकतीने लढवत आहे. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता लोक प्रस्थापित मंडळींना कंटाळले आहेत. त्यामुळे खानापूर मध्ये निश्चितपणे परिवर्तन अपेक्षित आहे. भारतीय जनता पार्टी परिवर्तन करण्याच्या उद्देशाने विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीत उतरत आहे. आगामी काळात खानापूर नगर पंचायतीची निवडणूक आणि विटा नगरपालिका निवडणूक देखील भाजपा लढणार असल्याचे संकेत आमदार पडळकर यांनी दिले.