खानापूर / प्रतिनिधी
खानापूर शहराचा सर्वांगीण विकास दृष्टीपथात ठेवून शहराच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वच नगरसेवकांनी घेतला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून नगरसेवकांमध्ये दोन गट पडले होते. पण पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन्ही गटांशी संवाद साधून शहर विकासासाठी नगराध्यक्ष निवडणुकीत गटबाजी न आणता सर्वांनी एकसंध राहावे, अशी सूचना केली. त्या सूचनेला प्रतिसाद देऊन सर्व नगरसेवकांनी गटबाजी न करता एकमताने नगराध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
खानापूर नगराध्यक्षपद सामान्य गटासाठी आल्याने त्यासाठी माजी नगराध्यक्ष रफिक खानापुरी यांचे सुपूत्र मजहर खानापुरी तसेच ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर इच्छुक होते. यासाठी दोघांनीही वेगवेगळय़ा मार्गाने प्रयत्न सुरू केले होते. पण पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन्ही गटांना बेंगळूर येथे बोलावून गटबाजी न ठेवण्याची सूचना केली. पहिल्या अडीच वर्षात दोन्ही गटांना न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. यानंतर निवडणुकीला स्थगिती आली होती. पण दोनच दिवसात ती स्थगिती उठल्यानंतर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदांसाठी बुधवार दि. 4 नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाली. यानंतर नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार मजहर खानापुरी यांच्यासह त्यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांबरोबर चर्चा केल्यानंतर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नगराध्यक्षपदाचे दुसरे इच्छुक उमेदवार नारायण मयेकर व त्यांना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांना सोमवारी गोकाकमध्ये बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. पहिली संधी मजहर खानापुरी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व सर्वांनी मिळून एकत्रित काम करून शहर विकासाला चालना द्यावी, यासाठी पालकमंत्री या नात्याने माझ्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.
या पुढील काळात तुम्हालाही न्याय देवू, असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या या सूचनेला मयेकर व त्यांना सहकार्य दिलेल्या सर्व नगरसेवकांनी पाठिंबा व्यक्त केला. यामुळे आता बुधवार दि. 4 रोजी होणाऱया नगराध्यक्षपद निवडणुकीत मजहर रफिकसाब खानापुरी यांची बिनविरोध निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. त्यासाठी वॉर्ड क्रमांक 4 च्या नगरसेविका लक्ष्मी बसलिंग अंकलगी या एकमेव पात्र असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार आहे.