प्रतिनिधी / खानापूर
खानापूर येथे 2 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन शनिवारी धारवाड खंडपीठाचे न्यायमूर्ती अरविंदकुमार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हासत्र न्यायाधीश सी. एम. जोशी होते.
प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन मगदूम, केएसबीचे सदस्य कलमेश किवड उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी यांनी केले व न्यायालयाची माहिती दिली.
यावेळी उद्घाटनपर भाषणात न्यायमूर्ती अरविंदकुमार म्हणाले की, न्यायसंस्था पवित्र असून त्याचे पावित्र्य वकील व पक्षकारांनी टिकून ठेवले पाहिजे, नागरिकांनी खोटे दावे दाखल करुन न्यायलयाचा वेळ, पैसा, श्रम वाया जाणार नाही. याची दखल घेणे गरजेचे आहे. आजकाल खोटय़ा केसीस दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. ते जर थांबले नाही तर समाजामध्ये अराजकता येण्यास वेळ लागणार नाही. पादर्शकता तपासण्याची कसरत वकिलानी केली पाहिजे, न्यायालयीन इमारत म्हणजे न्यायदेवतेचे पवित्र मंदिर आहे. त्याचा सदुपयोग जनतेसाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी न्यायमूर्ती सचिन मगदूम म्हणाले, कोरोनामुळे न्याय व्यवस्थेवर ताण पडून अनेक दावे तुंबून राहिले आहेत. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हळूहळू सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पक्षकारांना न्याय मिळाल्यास मदत होईल.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचा शाल व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे मर्यादित जणांच्या उपस्थितीत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ वकील ऍड. व्ही. एन. पाटील, ऍड. एच. एन. देसाई, ऍड. एम. व्ही. देशपांडे, ऍड. के. सी. कळळेकर, ऍड. आर. एन. पाटील, ऍड. आर. एम. हिरेमठ, ऍड. एस. एन. लोटुलकर, ऍड. एस. एस. कपिलेश्वरी, ऍड. एस. वाय. कदम, ऍड. ए. डी. देसाई, एस. के. नंदगडी, ऍड. पी. एन. बाळेकुंद्री व ज्येष्ठ व ज्युनियर वकील उपस्थित होते. सूत्रसंचालन ऍड. व्ही. एम. पारिश्वाड यांनी केले. आभार न्यायाधीश मुरलीमोहन रेड्डी यांनी मानले.