खानापूर/ प्रतिनिधी
खानापूर-पारिश्वाड रस्त्यावर बलोगा क्रॉसनजीक शेताकडे जनावरे घेऊन जाणाऱया शेतकऱयाला एका दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.
या शेतकऱयाचे नाव नारायण तातोबा पाटील (वय 68) राहणार दोड्डहोसूर ता. खानापूर असे आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नारायण हे आपली जनावरे चारविण्यासाठी शेताकडे घेऊन जात होते. त्यावेळी पारिश्वाडकडून खानापूरकडे येणाऱया दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोकीला जबर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती खानापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला. यानंतर नारायण पाटील यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सायंकाळी दोड्डहोसूर येथे त्यांचा अंत्यविधी झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. खानापूर-पारिश्वाड रस्त्याचा नुकताच विकास करण्यात आला आहे. रस्ता चांगला असल्याने वाहनेदेखील भरधाव येत आहेत. यामुळेच अपघाताचा धोकाही वाढला आहे.