छत्रपती शिवाजी महाराज-संगोळी रायण्णा पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ मोर्चा : समाजकंटकांवर कडक कारवाईचे निवेदन, सुनिल गावडा विरुद्ध फिर्यादही दाखल
प्रतिनिधी /खानापूर
बेंगळूर येथे समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची तसेच अनगोळ-बेळगाव येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ खानापुरातील विविध हिंदू संघटना व सर्वपक्षीयांनी केलेल्या आवाहनाला खानापूरला मोठा प्रतिसाद मिळाला. रविवारचा आठवडी बाजार असूनदेखील शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवल्याने खानापूर बंद शंभर टक्के यशस्वी झाला. यासाठी भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी विशेष पुढाकार घेतला होता. सकाळी 11 वाजता हिंदू संघटनांचे कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींनी लक्ष्मी मंदिरजवळ एकत्र येवून संपूर्ण शहरात पदमोर्चा काढला.
मोर्चा सुरू होण्यापूर्वी पंडित ओगले यांनी स्वागत केले. तर ऍड. आकाश अथणीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल यांची भ्याड कृत्याचा निषेध करणारी भाषणे झाल्यावर पदमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या छायाचित्रांसह ध्वज फडकाविण्यात आला होता. हा मोर्चा स्टेशनरोड, राजा शिवछत्रपती चौक, महामार्ग, संत बसवेश्वर चौक, पारिश्वाड रोडमार्गे बाजारपेठेत आला. यानंतर बाजारपेठ, चिरमुरकर गल्ली, स्टेशनरोड मार्गे पुन्हा लक्ष्मी मंदिरजवळ आला. या मोर्चाच्या अग्रभागी पंडित ओगले, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, तसेच विविध हिंदू संघटना तसेच राजकीय पक्षाची नेतेमंडळी होती.
मोर्चात युवा वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता. मोर्चामध्ये शिवरायांची प्रेरणागीते सादर करण्यात आली. मोर्चाचे लक्ष्मी मंदिरजवळ आगमन होताच पुतळा विटंबनेचा निषेध करणारी अनेकांची भाषणे झाली. तसेच समाजकंटकांना ताडतीने पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यानंतर काही वेळातच लक्ष्मी मंदिराजवळ तहसीलदार रेष्मा तालिकोटी तसेच पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांचे आगमन झाले. त्यावेळी विविध हिंदू संघटना सर्वपक्षीय यांच्यावतीने तहसीलदार रेष्मा तालिकोटी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की, शिवरायांनी मोगलांच्या तावडीतून भारतमातेची मुक्तता केली. तसेच सर्व जाती धर्माला घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची केवळ भारतच नव्हे तर जगातील अनेक देश नेहमी दखल घेऊन त्यांच्या राजनितीचा आदर्श घेतात. अशा थोर युगपुरुषाच्या पुतळय़ाचा अवमान करणे ही अत्यंत गांभीर्याची घटना असून यास कारणीभूत असलेल्या समाजकंटकांना कडक शासन करावे, अशी मागणी केली आहे.
समाजकंटकांना कडक शासन करा
तसेच अनगोळ क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळय़ाची झालेली विटंबना हा देखील अत्यंत निदंनीय प्रकार आहे. स्वातंत्र्य लढय़ात संगोळी रायण्णांचे योगदान महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांच्या पुतळय़ाची विटंबना कुणालाही सहन होऊ शकणार नाही, यामुळे त्यास कारणीभूत असलेल्या समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केली. तहसीलदार रेष्मा तालिकोटी यांनी निवेदनाचा स्वीकार करून खानापूर शहरातील विविध हिंदू संघटना व सर्व पक्षीय नेत्यांनी निवेदनात केलेली मागणी अत्यंत योग्य असून संबंधित समाजकंटकांना कडक शासन झालेच पाहिजे, सदर निवेदन जिल्हाधिकाऱयांकडे, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवून देण्याची ग्वाही दिली. तसेच याप्रसंगी भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी बेंगळूर येथील शिवपुतळय़ाची विटंबना करणाऱया संजय गावडा व त्याच्या सहकाऱयांवर खानापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करून घ्यावी, अशी मागणी करून सदर फिर्याद पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्याकडे सादर केली.
यावेळी सुरेश शिंगे म्हणाले, संजय गावडा व त्यांच्या साथीदारांना बेंगळूर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पंडित ओगले यांनी खानापूर पोलीस स्थानकात दाखल करण्यासाठी दिलेली फिर्यादही नोंदवून घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर शांतिमंत्र होऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळी बैलहोंगल विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विशेष म्हणजे कन्नड रक्षण वेदिकेचा एक गटही या निषेध मोर्चात सहभागी झाला होता. व त्यांच्याकडूनही बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा तसेच अनगोळ येथील संगोळी रायण्णा पुतळा विटंबनेचा निषेध करण्यात आला. व संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.