खिसे कापताना एकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या केले स्वाधीन : सतर्कतेमुळे शिक्षकाचे वाचले 25 हजार
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यात जांबोटी मार्गावर लुटमारीच्या प्रकाराला ऊत आला असतानाच गर्दीचे औचित्य साधून खिसेकापूंचाही सुळसुळाट वाढला आहे. खानापूर बसस्थानकावर बुधवारी दुपारच्या सुमारास बेळगाव-पणजी या बसमध्ये चढताना एका शिक्षकाच्या खिशाला ब्लेडने कापून लुटमारीचा प्रकार करताना एकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. खानापूर परिसरात अशा खिसेकापुंच्या प्रकारामुळे प्रवासात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बसने बेळगावला जाण्यासाठी खानापूर बसस्थानकावर बेळगाव-पणजी बसमध्ये चढत असताना मराठा मंडळ पीयु कॉलेजचे प्राध्यापक आर. के. चन्नपगौडर या यांच्या खिशाला अचानकपणे एका भामटय़ाने ब्लेडच्या सहाय्याने कात्री लावली. सदर शिक्षकाच्या खिशात 25 हजार रुपये होते. केवळ त्या शिक्षकाच्या सतर्कतेमुळे खिशा कापताक्षणीच त्या भामटय़ाला पकडण्यात यश आले. सदर भामटय़ाने खिसा कापल्याचा प्रकार निदर्शनाला येताच उपस्थित प्रवाशांनीही त्याला पकडून चोप दिला व पोलिसांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी याची चौकशी केली असता खिसेकापू हुबळीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
खानापूर परिसरात अशा वाढत्या चोरी प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह जनतेत घबराट पसरली आहे. गेल्या आठडवडय़ात पिरनवाडी-जांबोटी व खानापूर-जांबोटी या मार्गावर एकाकी प्रवासी बघून त्यांना लुटण्याचा प्रकार दिसून आला. यामुळे या मार्गावर गेल्या आठवडय़ाभरात सायंकाळची गर्दी रोडावली आहे. प्रवाशांची अशी लुटमार होत असताना मात्र त्यांना पकडण्यात यश आले नाही. याची प्रवाशांत धास्ती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे खानापूर बसस्थानक किंवा शिवस्मारक चौकातील बसथांब्याच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन खिशातील पाकीट लंपास करणे अथवा अनवधानाने खिसे कापून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वी अनेकवेळा बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱया गर्दीचा फायदा घेऊन लुटणारी टोळीही कार्यरत असल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने चोरी करणाऱया महिलांचा अधिक भरणा असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. खानापूर बसस्थानकावर अशा चोरी करणाऱया महिलांनाही पकडण्याचा प्रयत्न झाला. व पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आले. पुन्हा अशाचप्रकारे बुधवारी बसमध्ये चढताना सदर शिक्षकाच्या खिशाला कात्री लावणाऱया 25 ते 30 वयोगटातील एका चोरटय़ा युवकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सुदैवाने त्या शिक्षकाचे पैसे खिशातच राहिले. असाच प्रकार एका सर्वसामान्य व्यक्तीवर घडल्यास प्रवाशांचा सुखकर प्रवास कधी होणार, असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे. यासाठी पोलिसांनी अशा प्रकारांवर करडी नजर ठेवून खिसेकापू अथवा लुटमारी करणाऱया लोकांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. पण अशा खिसेकापू अथवा लुटमारुच्या विरोधात ठोस पुरावे मिळत नसल्याने त्यांना पुन्हा सोडून दिले जाते. खानापुरात रंगेहात पकडलेल्या त्या खिसेकापूला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पण त्याच्यावर योग्य कारवाई झालीच नाही. त्याला पोलिसांनी उशीरा सोडून दिले. पण अशा प्रकारांमुळे चोरटे अधिकच मोकाट होत आहेत. यासाठी त्यांच्यावर सक्त कारवाई होणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्यांतून व्यक्त केले जात आहे.