प्रतिनिधी /खानापूर
फाल्गुन अमावास्या (मृत्यूंजय अमावस्या) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजानी हिंदू धर्मासाठी तब्बल 40 दिवस औरंगजेबचे पाशवी अत्याचार सहन करुन बलिदान दिले. ते बलिदान हिंदू धर्मिंयांच्यावतीने संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून गांभीर्याने पाळण्यात येते. दि. 14 मार्च ते दि. 12 एप्रिल 2021 (फाल्गून शुद्ध ते फाल्गून वद्य अमावस्या) हा कालावधीत बलिदान मास आचरणाबरोबरच सूतक म्हणून पाळण्यात येतो. धर्मवीर संभाजी महाराज चौक खानापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व मूर्तीचे विधिवत पूजन करुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात आला. यावेळी गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी लिहिलेल्या संभाजीसूर्य हृदय या श्लोकाचे पठण करण्यात आले. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांचे चरित्र वाचन करण्यात येत होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने गेला संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. या निमित्त सोमवार दि. 12 एप्रिल रोजी वढू तुळापूर येथून आणलेली धर्मवीर ज्वाला घेऊन शिवस्मारकाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला सकाळी 7 वाजता अभिषेक घालण्यात आला. व प्रेरणा मंत्राने मुख पदयात्रेची सुरवात करण्यात आली. खानापूर शहराच्या विविध भागातून मुख पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. विविध मार्गाने पदयात्रा धर्मवीर संभाजी महाराज चौकात
आली.
प्रारंभी संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. व विधिवत पूजा होमहवन करुन श्लोक गीत म्हणून आदरांजली वाहिली. यावेळी सर्व धारकऱयांनी व शिवशंभू भक्तानी संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चित्तेला अग्नी देऊन धर्मवीर ज्वाला शांत करण्यात आली. व पेटवलेल्या चितेच्या साक्षीने प्रतीज्ञा घेऊन ध्येय मंत्राने सांगता करण्यात आली.
यावर्षी प्रथमच ग्रामीण भागातील कुप्पटगिरी, यडोगा, लोकोळी, गर्लगुंजी, जांबोटी, ओलमणी, करंबळ, लालवाडी, हेब्बाळ, कारलगा, नंदगड, हलशीवाडी, येथेही धर्मवीर बलिदान मास पाळण्यात आला. खानापूर गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व धारकरी, माताभगिनी तसेच धर्मवीर संभाजी महाराज युवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.