प्रतिनिधी/ खानापूर
येथील बेळगाव-पणजी महामार्गावरील तीन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर व एक पान दुकान फोडून चोरटय़ांनी रोख रक्कम पळविल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. महामार्गावर झालेल्या चोऱयांच्या प्रकारामुळे खानापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील हॉटेल कावेरीमध्ये चोरांनी मागील दरवाजा फोडून प्रवेश केला. व गल्ल्यातील 9 हजाराची रोख रक्कम पळविली. या हॉटेलजवळ असलेल्या जोरापूर मेडिकल स्टोअरचे कुलूप फोडून गल्ल्यातील रोख रक्कम पळविण्यात आली. याच भागातील रेणुका मेसमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी चोरांच्या हाती काहीच लागले नाही. त्याचप्रमाणे रेणुका रेस्टॉरंट व पान दुकान फोडून गल्ल्यातील रक्कम लंपास केली आहे.
वास्तविक महामार्ग असल्यामुळे मध्यरात्रीही या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. त्यापैकी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. तरी देखील चोरीच्या या घटनांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोऱयांचा तपास लावावा, अशी मागणी होत आहे.