आमदार अंजली निंबाळकर यांनी घेतला आढावा ; कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काळजी घेणे अत्यंत गरजेचे
प्रतिनिधी / खानापूर
देशात आता कोरोनाच्या दुसऱया लाटेची सुरुवात झाली आहे. गेल्या लाटेपेक्षा या वेळची लाट वेगळी असल्याने कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनीच वेशेष काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे.
तालुक्यातील कोरोना महामारी रोखण्यासाठी मास्क, सामाजिक अंतर व लसीकरणावर भर द्यावा, असे आवाहन आमदार अंजली निंबाळकर यांनी सोमवारी तालुका पंचायत सभागृहाच्या समोरील पटांगणात घेतलेल्या तालुकास्तरीय अधिकाऱयांच्या कोरोना महामारी आढावा बैठकीत बोलताना केले.
यावेळी त्या म्हणाल्या, लसीकरणाविषयी जनमाणसात जागृती करणे गरजेचे आहे. यासाठी तालुका प्रशासनाने खानापूर नगरसह ग्राम पंचायतस्तरावर विशेष मोहीम हाती घ्यावी. ग्राम पंचायतनिहाय नेमण्यात आलेल्या कमिटीला अधिक सक्षम करावे. एखादा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर वेळीच उपाययोजना करावी, प्रत्येक घराघरात जाऊन कोरोना संशयिताचा शोध घ्यावा व प्रत्येकाला कोरोनाविषयी जागरुक करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्यात लसीकरणासंदर्भात चांगलीच प्रगती झाली आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनाही कोरोना लसीकरण देण्यास सुरुवात झाली आहे. पण तालुक्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे, याची आपल्याला जाणीव आहे. सरकारदरबारी यासाठी मी विशेष प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर उपस्थित अधिकाऱयांनी तालुक्यातील कोरोना महामारीसंदर्भात माहिती दिली.
नियमावलींचे कडक पालन
यावेळी बोलताना तहसीलदार रेश्मा तालिकोटी म्हणाल्या, कोरोना महामारी रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून वेशेष दक्षता घेतली जात आहे. या कार्यात आरोग्य खाते, पोलीस खाते, अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्यांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. तालुक्यात कोरोनासंदर्भात असलेल्या नियमावलींचे कडक पालन केले जात आहे. प्रत्येक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात नेमण्यात आलेल्या दक्षता कमिटीकडून वेशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक चार ते पाच पंचायतींवर एका तालुकास्तरीय अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी दिली.
सात वॉर्डांसाठी एक कमिटी स्थापन
खानापूर शहरातील परिस्थितीची माहिती देताना मुख्याधिकारी विवेक बन्ने म्हणाले, शहरातील सात वॉर्डांसाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्या मार्फत प्रत्येक विभागावर कोरोनासंदर्भात नियंत्रण ठेवण्यात येत आहे. घरोघरी भेट देऊन कोण कोरोनाबाधित आहे किंवा बाहेरून कोणी त्या घरात आले आहे का, याचे सर्वेक्षणही करण्यात आले असून आतापर्यंत 26 जण परप्रांतातून तर तीन जण परदेशातून आपल्या घरी आले आहेत. त्यापैकी परदेशातून आलेल्या तिघांनी कोरोनाची तपासणी करून घेतली असून ते निगेटिव्ह आहेत. उर्वरित 26 जणांची यादी आरोग्य खात्याला दिली असून त्या सर्वांचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात 59 कोरोनाबाधित सापडले असून त्यापैकी बरेचजण कोरोनामुक्तही झाले आहेत.
दंडात्मक कारवाई करताना एक सर्जीकल मास्कही द्या
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे म्हणाले, जनतेकडून कोरोना नियमांचे कडक पालन होते की नाही, यावर पोलिसांनी विशेष नियंत्रण ठेवले आहे. विनामास्क तसेच क्लोजडाऊनच्या काळात काम नसतानाही घराबाहेर फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनतेकडून नियमांचे पालन करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व अधिकाऱयांनी आपले मत व्यक्त केल्यावर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आमदार अंजली निंबाळकर यांनी या संदर्भात आणखी काही उपयुक्त सूचनाही दिल्या.
त्यामध्ये विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई तर कराच, पण ती करत असताना संबंधिताला एक सर्जीकल मास्कही द्यावा, त्यासाठी दंडातून मिळालेल्या रकमेचा उपयोग करावा, तसेच खानापूर शहरात सात वॉर्डांसाठी एक कमिटी करण्यापेक्षा प्रत्येक वॉर्डाला एक नगरपंचायतीचा सेवक व एक शिक्षक अशी दोघा जणांची कमिटी करून त्या कमिटीने दिवसातून एक वेळ संबंधित वॉर्डातील प्रत्येक घराला भेट देऊन आरोग्यविषयक परिस्थिती पाहावी. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे तसेच ग्रा. पं. पातळीवरील कमिटय़ाही अधिक सक्रिय कराव्यात, अशी विनंती केली. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल खाते, आरोग्य खाते, पोलीस तसेच डॉक्टर्स, नर्स अंगणवाडी शिक्षिका, आशा कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष प्रशंसा
केली.
यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी हलपन्नावर, हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक यु. एस. आवटी, कृषी खात्याचे अधिकारी बी. बी. चव्हाण यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हय़ात खानापूर तालुका लसीकरणात प्रथम कोरोनाविषयीच्या परिस्थितीची माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे म्हणाले, तालुक्यात आतापर्यंत 54.99 टक्के लोकांनी लसीकरण केले असून यामध्ये संपूर्ण जिल्हय़ात खानापूर तालुका प्रथम क्रमांकावर आहे. तालुक्यातील एक तालुका हॉस्पिटल, एक समुदाय हॉस्पिटल तसेच 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा अनेक एकूण 11 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी दिवसाला 150 ते 300 जणांचे लसीकरण केले जात आहे, पण लसींचा तुटवडा भासत आहे. तालुक्यात दि. 1 मार्चपासून आतापर्यंत एकूण 378 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 128 जण सक्रिय रुग्ण असून उर्वरित रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या चार दिवसात तालुका हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित तीन गरोदर महिलांची प्रसूती व्यवस्थितपणे करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.