प्रतिनिधी / खानापूर
खानापूर-परिश्वाड रस्त्याला जोडणाऱया मुडेवाडी-हत्तरगुंजी रस्त्यावर सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालला आहे. यामुळे या रस्त्यावरची अवजड वाहतूक तातडीने थांबवावी, अशी मागणी मुडेवाडी-डुक्करवाडी-हत्तरगुंजी ग्रामस्थांनी केली
आहे.
या मार्गावर मुडेवाडी, डुक्करवाडी, हत्तरगुंजी आदी तीन गावे येतात. तसेच ही गावे खानापूर शहरापासून अत्यंत जवळ असल्याने त्या ठिकाणी असलेल्या माळरानावर आता एन. ए लेआऊट करून प्लॉट विक्रीही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यामुळे सदर मार्गावर आता लोकवस्ती अधिक वाढत चालल्याने वाहनांची रहदारीही वाढली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण 7 वर्षापूर्वी करण्यात आले होते. पण गेल्या एक-दीड वर्षापासून तो रस्ता खराब होत चालला आहे. त्यातच आता या रस्त्यावरुन शेडू व माती वाहतूक करणारी अवजड वाहनेही सुरू आहेत.
या वाहनात 30 टनापर्यंत शेडू माती भरली जाते. यामुळे रस्ता अधिकच खराब होत चालला आहे. यामुळे त्या रस्त्यावरुन दुचाकी वाहने चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. या रस्त्यावर एक नालाही येतो. त्या नाल्यावर पूल असला तरी तो देखील दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. अवजड वाहनामुळे तर तो अधिकच कमकुवत होण्याचा धोका असल्याने महसूल खात्याने व पोलिसांनी याची दखल घेऊन या रस्त्यावरील अवजड वाहतुकीला तातडीने बंदी घालावी, अन्यथा या भागातील गावकऱयांना कायदा हातात घेऊन अवजड वाहने अडवावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.