प्रतिनिधी /खानापूर
दोन दिवसांपूर्वी बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावरती काही समाजकंटकांनी शाई फेकली. सुरुवातीला बेळगावात मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर दि. 13 रोजी कन्नड वेदिकेच्या काही गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी शाईफेक केली. तसेच काही दिवसांनी चित्रदुर्ग येथे भगवाध्वज जाळण्यात आला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ मूर्तीवर शाईफेक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छत्रपती शिवरायांचा केलेला अपमान देश अजिबात सहन करणार नाही. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतील, असा संदेश दिला आहे. सीमाभागातून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे त्या समाजकंटकांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहे. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक खानापूर येथे शनिवार दि. 18 रोजी झाली. निषेध सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
यावेळी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सरचिटणीस आबासाहेब दळवी, महादेव घाडी, म. ए. समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, बाळासाहेब शेलार, रुक्माण्णा झुंझवाडकर, शिवाजी पाटील, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, दीपक देसाई, अमृत पाटील आदींनी निषेधाची भाषणे करून या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी म. ए. समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.