ठिय्या आंदोलनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यात जागृती फेरी काढणार : 11 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका समितीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या बुरुजावरून समितीच्या तोफा पुन्हा डागूया आणि समितीची शान पुन्हा उंचावूया, समितीने काय केले? यापेक्षा समितीचा त्याग हा मोठा आहे. आम्ही विकासापेक्षा मायबोली मराठीसाठी रक्त सांडलेले आहे. त्यामुळे बाहेरून येऊन आम्हाला 60 वर्षांत काय केले? हे विचारण्यापेक्षा चार वर्षांत तालुक्याची काय दशा झाली, हे सर्वश्रुत व सर्वांच्या डोळय़ांसमोर आहे. याबाबत 11 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन समितीचे धोरण स्पष्ट करण्यात येईल, असे शिवस्मारक येथे सोमवारी झालेल्या म. ए. समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना दिगंबर पाटील म्हणाले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी कागदपत्रे मिळविण्यासाठी दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला खानापूर म. ए. समितीच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसेच या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यात जागृती करण्यासाठी ग्रामीण भागात दौरे करण्याचे ठरविण्यात आले.
आबासाहेब दळवी यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी समितीच्या पुढील वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांनी विचार मांडले. तसेच एकीची प्रक्रिया मध्यवर्तीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, यासाठी ठराविक वेळ देण्यात यावा, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली. याला उत्तर देताना यशवंत बिरजे म्हणाले, 8 ऑगस्टला होणाऱया ठिय्या आंदोलनानंतर एकीबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल.
विलास बेळगावकर म्हणाले, तालुक्यात समितीच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष मराठी भाषिकांत बुद्धीभेद करत आहेत. यासाठी समितीनेही आता याबाबत जागृकता निर्माण केली पाहिजे.
यावेळी नारायण कापोलकर म्हणाले, भाजप, काँग्रेस व इतर पक्षांनी समितीबाबत मराठी भाषिकांत दुराग्रह निर्माण केलेला आहे. मराठी भाषिक जनता आजही समितीच्या पाठीशी असून तालुक्यात पुन्हा समितीचा झेंडा फडकाविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाळाराम शेलार, रुक्माण्णा झुंजवाडकर, मऱयाप्पा पाटील, शंकर गावडा यांचीही भाषणे झाली.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते पुंडलिक चव्हाण, प्रकाश चव्हाण, अमृत पाटील, रमेश देसाई, अमित पाटील, अविनाश पाटील, डी. एम. गुरव, एल. एच. पाटील, विठ्ठल गुरव, प्रदीप पाटील, विशाल पाटील, विक्रम पाटील, देवाप्पा भोसले यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही मराठी भाषा-मायबोलीसाठी लढत आहोत!
यावेळी मुरलीधर पाटील म्हणाले, मध्यवर्तीच्या ठिय्या आंदोलनासाठी तालुक्यात जागृती करून मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी जे काय करता येईल ते आपण करुया, हे आंदोलन यशस्वी करून दाखवू. जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई म्हणाले, आमदार अंजली निंबाळकर यांनी समितीवर आगपाखड करण्याऐवजी हिमत असेल तर विधानसभेत सीमाप्रश्नासंदर्भात आवाज उठवावा. समितीने 60 वर्षांत काय केले, यापेक्षा मराठी भाषा टिकविली आहे. आम्ही मराठी भाषा व आमच्या मायबोलीसाठी लढत आहोत, आम्ही विकास किंवा स्वतःचा स्वार्थ पाहिलेला नाही. त्यासाठी समितीने काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही मराठी भाषिक आहात, हिमत असेल तर विधानसभेत आमच्या न्याय मागणीचा आवाज उठवा.