प्रतिनिधी/ खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण व दुपरीकरणाचे काम सुरु असले तरी त्यापैकी बेळगाव ते खानापूर चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून कोठेही वाहतुकीला अडथळा नसताना काम सुरु आहे. तर खानापूर ते रामनगर रस्त्याच्या दुपरीकरणाचे काम मात्र एकदमच संथगतीने सुरु असून या रस्त्यावर काही ठिकाणी दररोज गाडय़ा अडकण्याचे प्रकार सुरु असून यामुळे दिवसातून अनेकवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यामुळे वाहन वाहतुकदारासह यामार्गावर अवलंबून असलेल्या 25 गावातील जनतेमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
बेळगाव-पणजी महामार्गापैकी बेळगाव ते खानापूर रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. तर खानापूर ते रामनगर मार्गावर दोन्ही बाजूला वनसंपत्ती असल्याने वनखात्याने या मार्गाच्या केवळ दुपदरीकरणालाच मंजूरी दिल्याने त्या मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. पण त्यातही पर्यावरण खात्याने स्थगीती आणल्याने काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. या मार्गावर लहान मोठे नाले येत असल्याने त्या सर्व ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. तर दोन ठिकाणी वन्यप्राण्यांना जाणायेण्यासाठी भुयारी मार्ग काढले जात आहेत. त्या सर्व ठिकाणी वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्येही काढण्यात आले आहेत. पण यावर्षी झालेल्या मोठय़ा पावसामुळे अशा ठिकाणी चिखलमय वातावरण झाल्याने त्या ठिकाणी अवजड वाहने अडकून वाहतुकीची कोंडी होत आहे. दोन दिवसापुर्वी सावरगाळी गावाजवळ गाडय़ा रुतल्याने वाहतुक कोंडी झाली होती. तर मंगळवारी गुंजीजवळ सुरु असलेल्या पुलाच्या कामाजवळ दोन वाहने रुतल्याने जवळपास 5 तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यामुळे दोन्हीही बाजूला वाहनांची रांगच रांग लागली होती. वरचेवर होत असलेल्या वाहतुक कोंडीमुळे त्या ठिकाणी मंगळवारी परिसरातील लोकांनी आंदोलन केले. यानंतर महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱयांनी व संबंधीत कंट्राटदाराने त्याठिकाणी येऊन अडकलेली वाहने बाजूला करुन वाहतुकीचा मार्ग खुला केला. तरी देखील आता या मार्गावर अवलंबून असलेल्या गावातील जनतेला होणाऱया अडचणी सहन करणे कठीण झाले आहे. महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱयांनी आता याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष घालून वाहतुकीला वरचेवर होत असलेला अडथळा दुर करण्यासाठी निर्णयीत पाऊले उचलावीत अशी मागणी केली जात आहे. तसेच येत्या सोमवार दि. 7 सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री व खासदार अनंत कुमार हेगडे खानापूरला येत आहे. त्यावेळी त्यांनी खानापूर-लोंढा महामार्ग दुपदरीकरण कामाचा पाहणी दौरा करुन यासंदर्भात काम वेगाने तसेच वाहतुकीला अडथळा न आणता लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकाऱयांसह कामाचा ठेका घेतलेल्या संबंधीत कंपनीला ताकीद द्यावी अशी जनतेची मागणी आहे.