प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर, लोंढा, रामनगर महामार्गाचे काम येत्या पावसाळय़ापूर्वी पूर्ण करून सदर मार्ग वाहतुकीला खुला करावा, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका भाजप तसेच शिंदोळी, गुंजी, मोहीशेत व लेंढा ग्रामपंचायतीच्यावतीने प्रांताधिकारी अशोक तेली व तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांना सादर केले. भाजप नेते व महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर व तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत जि. पं. माजी सदस्य जोतीबा रेमाणी, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष रमेश शिगनाथ, सुभाष चलवादी, गुंजी पिकेपीएसचे संचालक प्रकाश गावडे, सुनील मड्डीमनी व इतर उपस्थित होते.
खानापूर-लोंढा-रामनगर महामार्गाचे काम गेल्या दोन महिन्यापासून बंद झाले आहे. या मार्गावर रुंदीकरणाबरोबरच लहान मोठे पूल व क्राँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. त्यापैकी दोन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पण पाच ठिकाणी पुलाचे काम अपूर्ण आहे. तसेच रस्त्याचेही अंतराअंतराने काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. आता पावसाळय़ासाठी केवळ दीड महिना शिल्लक राहिला आहे. त्याआधी रस्त्याचे काम पूर्ण होणे अशक्य असले तरी कमीतकमी एकेरी वाहतुकीच्या दृष्टीने कामाची पुर्तता करून पावसाळय़ात वाहतूक सुरू ठेवण्यात येणारी अडचण दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पावसाळय़ात रस्ता पूर्णपणे वाहतुकीला बंद होणार असून यामुळे खानापूर-गुंजी-लोंढा मार्गावरील अनेक गावांचा खानापूर शहराशी संपर्कच तुटणार आहे. या सर्व गावातील अनेक विद्यार्थी शाळा, कॉलेजसाठी खानापूरला ये-जा करत असतात. तसेच या भागातील सर्व गावांचे जीवनमानही खानापूर शहरावरच अवलंबून असल्याने एखाद्यावेळी रस्ता वाहतुकीला बंद झाल्यास या भागातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सदर कामाची जबाबदारी घेतलेल्या बिल्डकॉन कंपनीला पावसाळय़ापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ताकीद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी प्रांताधिकारी अशोक तेली यांनी आपली मागणी अत्यंत रास्त असून एक दोन दिवसातच त्या कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पावसाळय़ात होणारी अडचण दूर करण्याचा आदेश देतो, असे आश्वासन दिले.