प्रतिनिधी / खानापूर
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रात एका किल्ल्यावरून दुसऱया किल्यापर्यंत गडकोट मोहीम काढण्यात येते. या गडकोट मोहिमेत खानापूर तालुक्यातून दरवर्षी बरेच युवक सहभागी होतात. पण यावर्षी कोरोनामुळे महाराष्ट्रातील गडकोट मोहीम रद्द करण्यात आली. त्यामुळे खानापूर तालुक्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱयांनी शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खानापूर तालुक्यातील भीमगड किल्ल्यावर गडकोट मोहीम काढण्याचा निर्णय घेतला. आणि त्या निणर्यानुसार बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील धारकऱयांनी भीमगड सर करण्यासाठी तालुक्यातील गवाळी गावाकडे आगेकूच केली.
प्रारंभी खानापूरच्या शिवस्मारकासमोर सर्व धारकरी जमले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अभिषेक करण्यात आला. तसेच शिवरायांना मानवंदना देण्यात आली. धारकऱयांना निरोप देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे, तालुका प्रमुख मनोहर गावडे, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, विश्वनाथ पाटील, शिवा सुळकर, सागर पाटील, राजू परब यासह अनेक धारकरी उपस्थित होते.
त्यानंतर धारकऱयांनी पायी गवाळीकडे प्रस्थान केले. बुधवारी सायंकाळी 5 वाजता सर्व धारकरी गवाळीला पोहोचले. त्या ठिकाणी गवाळी ग्रामस्थांच्यावतीने धारकऱयांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये खानापूर तालुक्यातील जवळपास अडीचशे धारकऱयांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारी पहाटेपासून सर्व धारकरी भीमगड किल्ला सर करणार आहेत. व सायंकाळी ते पुन्हा माघारी येणार आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमगड किल्ला शिवरायांच्या काळात दक्षिणेकडील सर्वात सुरक्षित किल्ला मानला जात होता. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराज येऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. यामुळे अत्यंत दुर्गम भागातील भीमगड किल्ल्याला बरेच महत्त्व असून दरवर्षी या ठिकाणी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असतात.