प्रवाशांची गैरसोय ; दलदल निर्माण झाल्याने अनेक वाहने घसरून पडण्याचे प्रकार
वार्ताहर / खानापूर
खानापूर फुलेवाडी, मुडेवाडी व हत्तरगुंजी गावाला जोडणाऱया रस्त्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत कोटय़वधीचा निधी मंजूर झाला आहे. सदर निधीअंतर्गत रस्त्याचे काम पावसाळय़ापूर्वी हाती घेण्यात आले. पण कंत्राटदाराने रस्त्यावर काही ठिकाणी केवळ माती टाकून खडीकरण केले नसल्याने दलदल निर्माण झाली आहे.
मागील आठवडय़ात झालेल्या पावसामुळे या भागातील नागरिकांना जाताना मोठी कसरत करावी लागली. अनेकांची वाहने घसरुन रस्त्याकडेला जाऊन दलदलीत अडकली. ती काढतानाही मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी झालेल्या दलदलीची दखल घेऊन प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत खानापूर विभागीय अभियंत्यांनी खडी पसरवून तात्पुरता दिलासा दिला असला तरी पावसाळय़ात या ठिकाणी मात्र नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या रस्त्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत जवळपास पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधी अंतर्गत रस्त्याची भक्कम बांधणी व उत्कृष्ट दर्जाचे काम होणार आहे यात शंका नाही. मात्र, सदर काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण होणे अत्यंत गरजेचे होते. पण या रस्त्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केल्याने पावसाळय़ापूर्वी अपेक्षित खडीकरण व अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले नाही. या कामात हलगर्जीपणा झाल्याने त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे.
मागील आठवडय़ात झालेल्या दलदलीमुळे अनेकजण या चिखलात अडकून पडले. अनेकांनी सदर मार्ग सोडून दुसऱया मार्गाने खानापूरला येणे पसंत केले. सध्या पाऊस कमी झाला असल्याने दलदलही कमी झाली आहे. टाकण्यात आलेली खडी मजबूत बसली नसल्याने वाहनधारकांना याचा फटका बसत आहे. यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या अधिकाऱयांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला या रस्त्याचे संपूर्ण खडीकरण व बांधणी करून घेण्याची सक्त सूचना करावी, अन्यथा या भागातील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.