प्रवाशांना करावी लागतेय कसरत, वाहने घसरून पडण्याचे प्रकार : कंत्राटदाराला काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना देण्याची ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर /खानापूर
खानापूर शहरालगत असलेल्या खानापूर – फुलेवाडी – मुडेवाडी – हत्तरगुंजीला जोडणाऱया रस्त्याची पावसाळय़ात पार दुरवस्था झाली असून येथील रहिवासी तसेच शहराच्या उपनगरातील दादोबा नगर परिसरातील नागरिकांना या दलदलीचा सामना करावा लागत आहे.
खानापूर पारिश्वाड क्रॉस परिसरात हत्तरगुंजी-फुलेवाडी गावाकडे जाणाऱया मार्गावर अनेक व्यावसायिक आहेत. शिवाय परिसरात उपनगराची वसाहतही वाढली आहे. पावसाळय़ापूर्वी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या विकासकामाला जवळपास पाच कोटीचा निधी मंजूर झाला आह.s पण कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे काम थांबले आहे. या क्रॉसपासून बायपास महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत अनेक सुशिक्षित नागरिकांची वसाहत आहे. दादोबानगर भागात अनेक भाडेकरू तसेच सधन लोक राहतात, पण या ठिकाणी जाणाऱया रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकीधारकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळय़ात या रस्त्यावर बरेच पाणी साचते. सध्या रिमझिम पाऊस सुरू असल्याने दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यातून वाट काढणे धोक्मयाचे बनले आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांतून असमाधान व्यक्त होत आहे.
या भागातून हत्तरगुंजीकडे जाणारा मुख्य रस्ता आता काही दिवसानंतर बायपास महामार्गाच्या पारिश्वाड रोडवरील ओव्हर ब्रिजला वळसा घालून जावा लागणार आहे. त्यापुढील हतरगुंजी रस्ता प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या विकासकामात येतो. याही रस्त्यावर मोटय़ा प्रमाणात चिखल झाल्याने या भागातील लोकांना नको रे बाबा हा रस्ता… अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष
पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाळय़ामुळे या रस्त्यावर दलदल झाली होती. संबंधित अधिकाऱयांनी थोडय़ाफार प्रमाणात दलदल कमी केली. त्यानंतर पाऊस कमी झाला होता. त्यामुळे काहीअंशी रस्ता वाहतुकीला बरा होता. आता पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने या रस्त्याची वाताहत झाली असून वाहने चालवणे म्हणजे मोठी कसरत होत आहे. कंत्राटदाराने या रस्त्याचे काही अंतरावर खडीकरण केले नसल्याने दलदल निर्माण झाली आहे. अनेकांची वाहने घसरगुंडीसारखी रस्त्याकडेला जाऊन दलदलीत अडकली. ती काढतानाही मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी झालेल्या दलदलीची दखल घेऊन प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत विभागीय अभियंत्यांनी या ठिकाणी साठा केलेली खडी पसरून तात्पुरता दिलासा दिला होता. पण आता या रस्त्याच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष केल्याने पावसाळय़ापूर्वी अपेक्षित खडीकरण व अंतिम टप्प्यातील काम पूर्ण करणे गरजेचे होते.
…अन्यथा, ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार
या कामात हलगर्जीपणा झाल्याने त्याचा त्रास मात्र आता या भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे. यासाठी प्रधनमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या अधिकाऱयांनी याची तातडीने दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला या रस्त्याचे संपूर्ण खडीकाम व बांधणी करून घेण्यासाठी सक्त सूचना करावी. अन्यथा या भागातील नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा हत्तरगुंजी, मुडेवाडी, फुलेवाडी येथील ग्रामस्थांनी दिला आहे.