प्रदूषण नियंत्रण मंडळास चौकशीचे आदेश : मंडळाकडून आज होणार पाहणी
प्रतिनिधी /पणजी
सरकारने बातमीची गंभीर दखल घेतली असून त्याशिवाय सीआरझेड अंतर्गत दखल घेऊन पणजी-मडगाव चौपदरी महामार्गलगत मेरशी भागात अंदाजे पाऊण लाख चौ. मी. जमिनीतील खारफुटी झाडांचा विषप्रयोगाद्वारे अक्षरशः विनाश करून टाकल्याचे समोर आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून प्रदूषण नियंत्रण मंडळास पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आज शनिवारी सकाळी मंडळाकडून सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.
दै. तरुण भारतने हा वनसंहार उघडकीस आणला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून खास करून सर्व संबंधित सरकारी खात्यांमधील अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. या क्रूर संहारातून शेकडो जलचरही नष्ट झाले असून असंख्य उभयचर व पशुपक्षांचा अधिवासही संपुष्टात आला आहे.
या कृत्याद्वारे अत्यंत गंभीर स्वरुपाचा असा गुन्हा घडला असून राष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्यास सरकारमधील अनेक अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रश्नी अनेक पर्यावरणप्रेमींनी वन, पर्यावरण आदी खात्यात वैयक्तिक तक्रारीही दाखल केल्याचे वृत्त आहे.
भर महामार्गालगत असलेल्या या कांदलवनातील लाखो झाडांचा अशाप्रकारे विनाश झालेला असतानाही दै. तरुण भारतमध्ये वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत एकही सरकारी खाते किंवा अधिकारी, लोकप्रतिनिधी, यांच्या दृष्टीस हा प्रकार पडला नाही याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या दुष्कृत्यामुळे सुमारे पाऊण लाख चौ. मी. जमिनीतील खारफुटी झाडे अक्षरशः करपून गेली असून सदर झाडे नैसर्गिकरित्या करपल्याचे भासविण्यासाठी एखाद्या रासायनिक द्रव्याचा वापर करण्यात आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या रसायनाचे तवंग आजही सदर झाडांच्या मुळात पाण्यात स्पष्टपणे दिसत आहे.
या कृत्यामागे बिल्डर लॉबीचा हात आणि त्यांना राजकर्त्यांचा वरदहस्त असण्याचा संशयही आता व्यक्त होत असून सरकार आता कोणती कारवाई करते आणि कुणाला शिक्षा होते, याकडे पर्यावरणप्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, या वृक्षसंहारामुळे सदर भागात विदारक चित्र निर्माण झाले असून हा संहार पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत.