ऑगस्ट महिन्यात परतले विदेशी गुंतवणूकदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्थेत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण होऊनही मागील महिन्यात विदेशी पोर्टफोलियो गुंतवणकुदारांनी (एफपीआय) भारताच्या भांडवली बाजारात (समभाग आणि कर्जरोखे) प्रचंड गुंतवणूक केली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या (एनएसडीएल) आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात देशाच्या समभाग आणि कर्जरोखे बाजारात 49,879 कोटी रुपयांची (6.662 अब्ज डॉलर्स) खरेदी केली आहे. मागील 41 महिन्यांमध्ये ही भारतातील एफपीआयची सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. एप्रिल-जून तिमाहीत देशाचा विकासदर 23.9 टक्क्यांनी घसरला आहे.
भारतीय भांडवली बाजारात याहून अधिक मोठी गुंतवणूक एफपीआयने 42 महिन्यांपूर्वी मार्च 2017 मध्ये 56,261 कोटींची (8.577 अब्ज डॉलर्स) केली होती. परंतु डॉलर मूल्यात एफपीआयने यंदाच्या ऑगस्टमध्ये 17 महिन्यांमधील सर्वात मोठी गुंतवणूक केली आहे.
एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार कोरोना महामारीचा जागतिक फैलाव सुरू झाल्यावर मार्च महिन्यात एफपीआयने भारतातून 1,18,203 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. एप्रिल महिन्यात 14,859 कोटी रुपये आणि मे महिन्यातच 7,356 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. तर एफपीआयने जानेवारीमध्ये 957 कोटी आणि फेब्रुवारीत 8,970 कोटी रुपयांची खरेदी केली होती.
ऑगस्टमध्ये एफपीआय सलग तिसऱया महिन्यात भारतात गुंतवणूकदार ठरला आहे. जून महिन्यात एफपीआयने भारतात 26,009 कोटी रुपये आणि जुलैमध्येही 3,301 कोटी रुपयांची खरेदी केली होती. सप्टेंबरच्या पहिल्या 4 व्यावसायिक सत्रांमध्येही एफपीआयने भारतीय भांडवली बाजारात 1,589 कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
ऑगस्टमध्ये तीन वर्षांमधील सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक होऊनही यंदा आतापर्यंतचा एकूण आकडा नकारात्मकच आहे. यंदा एफपीआयने भारतीय बाजारातून 49,713 कोटी रुपये काढून घेतले आहेत. तर याच कालावधीत त्यांनी समभागांमध्ये 35,455 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर कर्जरोखे बाजारातून 1,12,914 कोटी रुपये काढून घेतले आहेत.