रस्ते राष्ट्रीय मालमत्ता, तेथे खासगी वाहने धावत नाही का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारी मालमत्तांच्या खासगीकरणावरून केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. याचदरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सरकारवर होत असलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. रस्ते देखील राष्ट्रीय मालमत्ता आहेत, पण यावर केवळ शासकीय वाहनेच धावावीत असे कुणीच म्हटलेले नाही. रेल्वेला पूर्णपणे कधीच खासगी हातांमध्ये सोपविण्यात येणार नसल्याचे गोयल यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना स्पष्ट केले आहे.
रेल्वेच्या खासगीकरणाचा सरकारवर आरोप केला जात आहे. पण रस्त्यांवर केळ शासकीय वाहने धावावीत असे कधीच म्हटले जात नाही. खासगी आणि शासकीय वाहने दोन्ही आर्थिक स्वरुपात सहाय्यभूत असल्याने असे घडत नसल्याचे म्हणत गोयल यांनी रेल्वे क्षेत्रात खासगी गुंतवणुकीचे स्वागत करण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
रेल्वेत खासगी गुंतवणुकीचे स्वागत करण्यात यावे कारण यामुळे सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. गुंतवणूक आणि प्रवासी सुरक्षेवर जोर दिल्याने रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच मार्च 2019 नंतर रेल्वे दुर्घटनेत एकही बळी गेलेला नसल्याचे गोयल म्हणाले.
कोविड-19 संकटात लॉकडाउन सुरू असताना रेल्वेसेवा सुरू ठेवली असती तर देशभरात कोविड-19 चा फैलाव झाला असता. रेल्वे स्थलांतरित मजुरांसाठी 2 कोटी जणांना मोफत जेवण आणि पाण्याच्या बाटल्यांसह सुमारे 4600 श्रमिक स्पेशल रेल्वे चालविली होती अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.