प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकार विविध विभाग खासगीकरण करण्यावर भर देत आहे. मात्र यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. तेंव्हा खासगीकरण करू नये, या मागणीसाठी विविध कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
रेल्वे, कोळसा खाणी, इतर खनिज खाण, एलआयसी, बीएसएनएल अशी विविध सरकारी विभाग खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र यामुळे देशाचे मोठे नुकसान होणार आहे. रेल्वे विभागात केवळ रेल्वे चालक आणि गार्ड वगळता इतर सर्व विभाग खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्याचे सरकारने ठरविले. यामुळे रेल्वेप्रवास महागणार आहे. खासगी कंपन्यांच्या हातात असे विभाग दिले तर सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. तेंव्हा वेळीच सरकारने सावध व्हावे व खासगीकरण टाळावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
विविध सरकारी खाणीदेखील कंत्राटदारांकडे सोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विमा कंपन्यांचेही खासगीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. हे सर्व चुकीचे आहे. तेंव्हा आमचा खासगीकरणाला तीव्र विरोध आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ऍड. नागेश सातेरी, ऍड. जी. डी. कुलकर्णी, सी. एस. बिदनाळ, मंदा नेवगी, सौरभ कांबळे, संध्या कुलकर्णी, श्रीमती नेगीहळ्ळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..