प्रतिनिधी/ पणजी
खासगी विद्यापीठ विधेयक आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ दुरुस्ती विधेयक येत्या विधानसभा अधिवेशनात आणले जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गोव्यात जिल्हा इस्पितळांना संलग्न असे वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य होणार आहे. दक्षिण गोव्याला याचा फायदा होऊ शकेल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून त्याचे आपण स्वागत करीत असल्याचेही ते म्हणाले.
खासगी विद्यापीठ विधेयकामुळे पीपीपी तत्वावर खासगी विद्यापीठ स्थापन करणे शक्य होणार आहे. तसेच कॅम्पस उभारणेही शक्य होणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी वित्त पुरवठा केला जाऊ शकतो. याबाबत अगोदर आपण वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चाही केली होती. त्यांनी प्रस्ताव पाठविण्याची सूचना आपल्याला केली होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 3 फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन सुरु होत आहे. त्यामुळे याच अधिवेशनात ही विधेयके मांडण्यात येणार आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 2500 कोटींची तरतूद केली आहे. त्याचा फायदा गोव्याला होणार आहे. सागरमित्र योजनेंतर्गत मच्छीमारी व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे. पंचायतराज आणि ग्रामीण विकास यासाठी 1.2 लाख कोटींची तरतूद केली आहे. देशातील ग्रामपंचायतींसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. आरोग्य क्षेत्रासाठी आणि पीपीपी पद्धतीने इस्पितळ उभारण्यासाठी 69 हजार कोटींची तरतूद केली आहे. याचा गोव्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार कोटींची तरतूद आहे. डेटा सेट्रीक पार्कमुळे गोव्याला फायदा होणार आहे. पर्यटनस्थळासाठी रेल्वे जोडणीचा फायदा गोव्याला मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे तर महिलावर्गाच्या उपक्रमासाठी 28 हजार कोटींची तरतूद केली आहे. 20 लाख शेतकऱयांना सोलर पंप देण्याची तरतूद आहे. स्टार्टअप योजनेतील तरतूद 25 कोटीवरुन 100 कोटी केली आहे. तसेच या योजनेत पाच वर्षापर्यंत कर सुविधा दिली आहे. बँक खातेधारकांचे विमा कवच 1 लाखावरुन 5 लाखावर नेले आहे.
हिंटरलॅण्ड पर्यटन विकासाचा प्रस्ताव
हिंटरलॅण्ड पर्यटन विकासाचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार होताच केंद्रीय वित्त मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत काही सूचना केल्या होत्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मुख्यमंत्री
केंद्रीय अर्थसंकल्प हा ’सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या केंद्र सरकारच्या ब्रीदवाक्यावर अवलंबून आहे. जातीभेद न करता सर्वांना पुढे घेऊन जाणारा असा हा अर्थसंकल्प आहे. आयकरामध्ये देण्यात आलेली सूट ही मध्यम वर्गीयांना दिलासा देणारी आहे. अर्थसंकल्पीय तरतुदी राज्यांना फायदा करुन देणाऱया आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांनाही या अर्थसंकल्पाचा लाभ होणार आहे, असेही ते म्हणाले. युवावर्ग, महिला विकासभिमूख योजना यावर दिलेला भर यामुळे गोव्याला त्याचा फायदा होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाचा फायदा कशा पद्धतीने करुन घ्यायचा यावर सरकार भर देणार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ सबका विकास’ हे ब्रीद वाक्य सार्थ ठरविणारा आहे. आरोग्य क्षेत्रातील मोठी आर्थिक तरतूद गोव्यासाठी लाभदायक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.