संसदेच्या खाद्यपेयगृहाचे अनुदान बंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या खाद्यपेयगृहाचे अनुदान बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी, खासदारांना किंवा त्यांच्या अभ्यागतांना संसदेत मिळणारे स्वस्त (जवळपास विनामूल्य) भोजन किंवा खाद्यपेये आता बंद होणार आहे. यापुढे त्यांना भोजन किंवा इतर पदार्थ बाजारभावाने घ्यावे लागणार आहेत.
बाहेर खानावळीत मिळणारी थाळी (राईसप्लेट) संसदेच्या खाद्यपेयगृहात अवघ्या साडेबारा रूपयांना मिळत असे. तसेच शाकाहारी किंवा सामिष जेवणही अतिशय स्वस्तात मिळण्याची सोय होती. तथापि, आता खासदारांचे मानधन, बैठक भत्ते व इतर लाभ मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे त्यांना भोजनही अत्यल्प मोल घेऊन देण्याचे कारण उरलेले नाही. म्हणून अनुदान बंद करण्यात आले आहे.
संसदेच्या खाद्यपेयगृहात चहा 1 रूपयाला, सूप साडेपाच रूपये, शाकाहारी थाळी साडेबारा रूपये, मांसाहारी थाळी 22 रूपये, दहीभात 11 रूपये, शाकाहारी पुलाव 8 रूपये, राजमा भात 7 रूपये, टोमॅटो भात 7 रूपये, फिश करी 17 रूपये, चिकन करी 20.50 रूपये, चपाती 1 रूपया, भात 2 रूपये आणि खीर साडेपाच रूपये असे दर आहेत, जे बाहेरच्या याच पदार्थांच्या तुलनेत एक दशांशापेक्षा जास्त स्वस्त आहेत. खासदारांसाठी इतकी स्वस्ताई का आणि कशी असे प्रश्न यापूर्वीही विचारण्यात आले होते. आता त्यांवर निर्णय घेण्यात आला आहे.