ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी अधिवेशन गदारोळात सुरू झाले. 12 खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाजवळ कारवाईचा निषेध केला. तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभागृहात खासदारांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी त्या खासदारांचे निलंबन मागे घेण्यास नकार दिला.
नायडू म्हणाले, ज्या सदस्यांनी सभागृहाचा अपमान केला आहे, त्यांना कोणताही पश्चाताप झालेला दिसत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी निलंबन मागे घेण्याची केलेली मागणी दखल घेण्यायोग्य नाही. तसेच सर्व खासदारांचं निलंबन नियमाला धरुन आहे. राज्यसभेच्या सभापतीकडे कारवाई करण्याचा अधिकार असून सभागृहदेखील कारवाई करु शकतं, असेही व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
राज्यसभेच्या 254 व्या अधिवेशनात 11 ऑगस्ट 2021 ला सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करुन कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी राज्यसभेच्या 12 खासदारांचे काल निलंबन करण्यात आले. त्यामध्ये फुलो देव निताम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद नसीर हुसैन आणि अखिलेश प्रसाद सिंग या काँग्रेसच्या सहा खासदारांचा समावेश आहे. तर डोला सेन आणि शांता छेत्री (तृणमूल काँगेस), प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई (शिवसेना) तसेच बिनोय विश्मव (सीपीआय) आणि एल्लामारम करीम या सीपीएमच्या खासदाराचा समावेश आहे.