अल-कायदासोबतचे कनेक्शन उघड : 300 मुलांचा थांगपत्ता नाही
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम आणि मणिपूरमध्ये 6 बालगृहांकडून निधीचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती निदर्शनास आल्याचे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सांगितले आहे. ‘मरकजुल मारिफ’ या संस्थेकडून चालविण्यात आलेल्या एका बालगृहाला एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडून देणगी मिळाली आहे. परंतु या स्वयंसेवी संस्थेची अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी असलेल्या कथित संबंधांवरून चौकशी विदेशात सुरू आहे.
पाहणी पथकाने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार या बालगृहांमध्ये 778 मुलेमुली राहत आहेत. लोकसभा खासदार मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी या बालगृहांची स्थापना केली होती. लोकसभेच्या संकेतस्थळावरील बदरुद्दीन यांनी दिलेल्या तपशीलानुसार या बालगृहांमध्ये 1,010 मुलांचे वास्तव्य आहे.
मरकजुल मारिफच्या संकेतस्थळावर 1080 मुले या बालगृहांमध्ये असल्याचे नमूद आहे. अशा स्थितीत संकेतस्थळावरील आकडा तसेच पाहणी पथकाला आढळून आलेल्या मुलांच्या संख्येत मोठे अंतर आहे. या अंतराची चौकशी करणे आणि 300 मुलांच्या सद्यस्थितीची माहिती घेणे आवश्यक असल्याचे बालहक्क आयोगाने म्हटले आहे. यातील एका बालगृहाला आयएचएच या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देणगी मिळाल्याचे पाहणी पथकाने बालहक्क आयोगाला कळविले आहे.
तुर्कस्तानशी संबंधित या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱयांची तेथील प्रशासनाने अल-कायदाशी असलेल्या कथित संबंधांवरून चौकशी केली होती. मुलांविषयीचा तपशील आंतरराष्ट्रीय संस्थेला उपलब्ध करविण्यात आल्याने चिंता वाढल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने स्वतःचा अहवाल आसाम आणि मणिपूरच्या सरकारला सोपविला आहे.