ऑनलाईन/ टीम
मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यांनतर मराठा समाज आक्रमक झाला असून, पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, ६ जून रोजी रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. पहिलं आंदोलन आज कोल्हापूरात होत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या मूक आंदोलनास विविध राजकीय पक्षाचे नेते आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.
दरम्यान जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींनी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. यांनतर लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडली.
LIVE UPDATE:
मराठा आंदोलनाच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या
भर पावसात आंदोलनाला सुरूवात
आज सकाळी 8 वाजल्यापासून हजारो मराठा आंदोलक छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जमा झाले. त्यानंतर 10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं. भर पावसात आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
प्रकाश आंबेडकर , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने यांचा आंदोलनाला पाठिंबा
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं आहे.
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा
या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून सहभागी -चंद्रकांत पाटील
मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं अधिवेशन झालंच पाहिजे : धैर्यशील माने
महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतलं. सर्व प्रतिनिधींना एकत्र केलं. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होतील. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकरांनी रणशिंग फुंकलं आहे. हे नक्कीच यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबलं, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावं आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावं. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असं शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.न्यायालयीन लढाईत बाजू व्यवस्थित मांडण्यासाठी समिती गठीत झाली आहे. महाराष्ट्राने नवीन मागास आयोगही नेमला. हा राज्याचा की केंद्राचा हा प्रश्न समाजाला आहे. 48 खासदारांनी अधिवेशनाची मागणी करावी, लोकसभेच आधिवेशन मराठा समाजासाठी झालं पाहिजे, राजेंनी संयमाने भूमिका घेतली आहे
आंदोलनस्थळी मंत्री हसन मुश्रीफ दाखल झाले आहेत. त्यांनी शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतले आहे. तसेच त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यास वेळ झाल्याने माफी देखील मागितली.