निसर्गप्रेमींमधून नाराजी : विकासाच्या नावाखाली शहर भकास
प्रतिनिधी / बेळगाव
विकासाच्या नावाखाली शहर भकासाकडे वाटचाल करीत आहे. सोमवारी नाथ पै सर्कलपासून खासबाग सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्यास सुरुवात केली आहे. या वृक्षतोडीमुळे निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीदेखील स्मार्ट सिटीच्या नावाखाली शेकडो वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे विनाकारण वृक्षतोड करू नये, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत
आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत रस्ता, गटारींसह इतर विकासकामे राबविण्यासाठी अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. नागरिकांनी विरोध करूनही याला न जुमानता वृक्षतोड करण्यात आली आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे क्षणार्धात भुईसपाट करण्यात येत आहेत. यामुळे वर्षानुवर्षे सावली, फळे, फुले देणारी झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. यामुळे या कामाबद्दल निसर्गप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गरिबांची सावली गेली
खासबाग येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. दुभाजकांवर लावण्यात आलेल्या झाडांच्या सावलीखाली हा बाजार भरतो. गरिबांचा बाजार अशी ओळख असणाऱया या बाजारात बेळगाव परिसरातील व्यापारी विक्रीसाठी येतात. या झाडांची तोड झाल्यास व्यापाऱयांना उन्हात बसून साहित्य विक्री करावे लागणार आहे. त्यामुळे ही वृक्षतोड थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे.