सातारा : साताऱ्यातील खा. श्री. छ. उदयनराजेंच्या जलमंदीर पॅलेसमध्ये आज 347 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उदयनराजेंच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, 6 जून 1674 साली छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लोकांनी केला. म्हणून हा दिवस शिवराज्याभिषेक दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाचे महत्त्व जर आपण पाहिले तर आपल्याला दिसून येईल की, लोकशाहीच्या स्थापनेचा हा पहिला दिवस. त्यानंतर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करुन वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना एकत्र आणून आपलसं केलं. इतर देशातील राजांप्रमाणे शिवाजी महाराजांनी स्वत:ला राजा म्हणून घडवलं नाही. त्यामुळेच रयतेचा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. रयतेच्या कल्याणासाठी जो विचार त्यांनी मनी बाळगला होता. तो त्यांनी मार्गी लावला.
आज खंत एवढीच वाटते की, त्यावेळची लोकशाही आज गेली कुठे?, का गेली? त्या काळात जे लोक बंधुभावनेने एकत्र राहत होते, आज त्यांच्यामध्ये मोठी तेढ निर्माण झाली. ही तेढ कोणी निर्माण केली. शिवाजी महाराजांचे नाव सर्वजण घेतात. मात्र, त्यांचे विचार आचरणात आणले जात नाहीत.